पुणे : मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यावर दोन डिसेंबरपर्यंत कारवाई करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायलयाने पोलिसांना दिले.
एल्गार परिषद प्रकरणी मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या जामीन अर्ज पुणे सत्र न्यायलयाने फेटाळल्यानंतर त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायलयात धाव घेतली. नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्या अर्जावर दोन डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करू नये, असे आदेश न्या. पी. डी. नाईक यांच्या खंडपीठाने दिले. त्यामुळे नवलखा यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
माओवाद्यांशी असणाऱ्या कथित संबंधांवरून नवलखा यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. त्याबाबत त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायलयात दाद मागितली होती. याबाबत कनिष्ठ न्यायलयात दाद मागावी असे सांगून ही याचिका फेटळली होती. त्यानंतर नवलखा यांनी पुणे सत्र न्यायलयात अर्ज दाखल केला होता. न्या. एस. आर. नवंदर यांच्या न्यायलयात ही सुनावणी झाली होती. त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. पोलिसांनी त्यांच्यावर एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करून एक जानेवारी 2018ला उसळलेल्या दंगलीला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता.