नांदेड – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी 2000 रुपयांच्या गुलाबी नोटांवर मोठा निर्णय घेतला आणि त्या चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर अनेकांनी सरकारवर टीका केली. कारण याआधी 2016 मध्ये नोटबंदी करण्यात आली होती. ज्याचा परिणाम सामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणात झाला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “गाजावाजा करुन दोन हजारांची नोट आणली होती. आता ती बंद केली. काळापैसा परत आणू, दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणाऱ्यांचं कंबरडं मोडलं जाईल असे म्हणाले होते, ते काहीच झालं नाही. लोकांना रांगेत उभं केलं. लोकांना अत्यवस्थ केलं. पुन्हा केंद्र सरकार त्याच मार्गावर आल्याचे म्हणत हजार, पाचशे रूपयांची नोटबंदी केली ती नोट परत येणारे का? मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळखंडोबा केला. त्यामुळे महागाईपासून बेरोजगारीचा भस्मासूर उभा राहिला आहे. ”
सगळ्यात जास्त काळा पैसा हा भाजपच्या नेत्यांकडे आणि त्यांच्या मित्रांकडे असल्याचा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला. दरम्यान, 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत चलनात राहतील. म्हणजेच ज्यांच्याकडे सध्या 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना त्या बँकेतून बदलून घ्याव्या लागतील.
त्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच बँका आता ग्राहकांना 2000 च्या नव्या नोटा देणार नाहीत.