नवी दिल्ली : जगभरातील 60 देशांत हजारो जणांना बाधा झालेला आणि तीन हजारपेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूंच्या साथीने भारताचे दरवाजेही ठोठावले आहेत. आज सापडलेल्या सहा बाधीतांमुळे भारतातील बाधीतांची संख्या 12 वर पोहोचली आहे. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या या साथीला तोंड देण्यास आपण किती सज्ज आहोत असा सवाल केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूंच्या साथीवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी ट्विट करत यंदाचा होळीला सार्वजनिक ठिकाणी होळीचा कार्यक्रमास सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.
Experts across the world have advised to reduce mass gatherings to avoid the spread of COVID-19 Novel Coronavirus. Hence, this year I have decided not to participate in any Holi Milan programme.
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2020
त्यांनी ट्विट केले आहे की,’जगभरातील तज्ञांनी करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी एखाद्या ठिकाणी गर्दी न करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे यावर्षी मी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.’
तत्पूर्वी, विमानतळ, बंदरावर येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. चीन, दक्षिण कोरीया, जपान, इराण, हॉंगकॉंग, मकाऊ, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, थायलंड, सिंगापूर आणि तैवानला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेट देणाऱ्या प्रत्येकाची कसून वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने कोरोनो विषाणूंची चाचणी करण्यासाठी 12 प्रयोगशाळा किंवा केंद्र तयार केली आहेत. त्याच्या निष्कर्षाची पडताळणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्थेत करण्यात येईल.