इंदुरीकर महाराज : कॅमेरे बंद झाल्यानंतर केली कीर्तनास सुरुवात
कोपरगाव – आपल्या मोबाइलच्या एका क्लीकने समोरच्या माणसाचे काय होईल, याचा विचार केला जात नाही. त्याच्या कुटुंबाची वाताहात होत असेल, त्यांना किती मानसिक त्रास सहन करावा लागत असेल, याची जाण ठेवली जात नाही. केवळ एखाद्याची बदनामी करायची, ही वृत्ती झाल्याने आमच्या सारख्यांवर संकट आले आहे, अशी खंत समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी व्यक्त केली.
कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर आपली खंत व्यक्त केली. मुलगा -मुलगी जन्म वेळेचा दाखला दिल्याने इंदुरीकर महाराज वादग्रस्त ठरले आहेत. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराज हे आपल्या प्रवचनातून स्त्रियांची बदनामी करत आहेत, असा आरोप करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनीही इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात तक्रार केली आहे. स्त्री भ्रूणहत्या व अंधश्रद्धा पसरवणे, याला इंदुरीकर महाराज खतपाणी घालत असल्याचा आरोप गवांदे यांनी केला आहे.
त्यामुळे अडचणीत सापडलेल्या इंदुरीकर महाराजांनी कोपरगाव येथे कीर्तनातून बोलत असताना या प्रकरणावर उपस्थितांचे लक्ष वेधले. केवळ मोबाईलच्या एका क्लीपवरून व एका क्लीकने बदनामी झाल्यामुळे. त्यामुळे यापुढे कीर्तनामध्ये व्हिडिओ शूटिंग कोणाला करू देणार नाही, असा ठाम निर्णय घेतला असावा. म्हणूनच इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनाचे व्हिडिओ शूटिंग प्रसारमाध्यमांसह कोणालाही करू दिले नाही. कॅमेरे बंद केल्यानंतर कीर्तनाला सुरुवात केली.
ते म्हणाले, खिसा गरम आहे तोपर्यंत हे जग आपल्यासाठी चांगले आहे. माणसापेक्षा सध्या जगात फक्त पैशावर प्रेम आहे. माणसाकडे जास्त पैसा आला की शत्रू वाढतात. ज्यांच्याकडे पैसा कमी त्यांच्याकडे शत्रू कमी ज्यांच्याकडे पैसा जास्त त्यांच्याकडे शत्रू जास्त, असे म्हणत इंदुरीकर महाराज यांनी ओढावलेल्या वादावर सर्वांचे लक्ष वेधले.