पालखी महामार्ग, शेतीमालावरील जीएसटीबाबत पुरवणी मागणी केली सादर
सासवड-पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर-हवेली मतदारसंघातील प्रश्न व समस्यांबाबत पुरवणी मागणी सादर करत विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली, आमदार संजय जगताप यांनी प्रथमच हिवाळी अधिवेशनामध्ये बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल सभापतींचे आभार मानले.
यावेळी पुरंदर-हवेली मतदारसंघातील पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल मुद्दा उपस्थित केला. सदर महामार्गावर अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या महिन्यात दिवे घाटात पालखी सोहळ्यात जेसीबी घुसल्याने दोन संत नामदेव महाराजांचे वंशजासह दोन वारकऱ्यांचे निधन झाले व 25 वारकरी जखमी झाले होते. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक गजानन पाटील यांचे याच महामार्गावर अपघाती निधन झाले. याच गंभीर मुद्द्यांकडे आमदार संजय जगताप यांनी सभागृहाचे लक्ष वेधले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री यांच्याकडे त्यांनी यापालखी महामार्गाची दुरूस्ती व विस्तारीकरणाची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
गेल्या पाच वर्षांमध्ये पालखी महामार्गावरील अपघातात 1 हजार 250 पेक्षा अधिक निरपराध नागरिकांचे बळी पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाच्या रखडलेल्या कामांमुळे गेलेले असल्याने या महामार्गाकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज असल्याचेही आ. जगताप यांनी यावेळी सांगितले.
आमदार संजय जगताप यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समस्यांकडे लक्ष वेधण्याकरता शेतीमाल व शेतीसाठी वापरले जाणारी खते, कीटकनाशके, बियाणे यावरती जो अवास्तव जीएसटी लावलेला आहे. शेतीमालावर ती ज्यावेळी शेतमाल बाजारात येतो. त्यावेळी जीएसटी लावला जात नाही. पीक बाजारपेठेत येण्यापर्यंतच्या बियाणे, खते, कीटकनाशके यांचा वापर शेतकरी करतात. यावर अवास्तव जीएसटी आकारला जात आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. शेतकऱ्यांचा नफा सर्व त्या जीएसटी मध्ये जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडत नाही. यामुळे जीएसटीबाबत शासकीय पातळीवर लवकरात लवकर निर्णय घेतले जावेत व शेतकऱ्यांच्या बियाणे, खते कीटकनाशके यावर जीएसटी मध्ये सवलत देण्यात यावी, अशी पुरवणी मागणी त्यांनी हिवाळी अधिवेशनात केली.
विरोधी पक्षाने जाणून-बुजून नवीन आमदारांना बोलण्याची संधी मिळू नये, याकरिता व वैचारिक चर्चा टाळण्यासाठी सभागृहात गोंधळ घालण्याचे प्रकार केल्याचेही नमूद करत विरोधकांच्या सभागृहातील गोंधळावर सडकून टीका केली.