पारनेर – नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार घाबरत असल्याचा हल्लाबोल आ. नीलेश लंके यांनी केला.
“विचार छत्रपतींचा, सन्मान बळिराजाचा’ हे बोधवाक्य घेऊन पारनेर बाजार समितीजवळील प्रांगणात चौथ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभाकर कवाद होते.
या वेळी तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, अशोक सावंत, जिल्हा उपप्रमुख अर्जुन भालेकर, अशोक कटारिया, राजेंद्र चौधरी, नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, कारभारी पोटघन, सुदाम पवार, शिवाजी व्यवहारे, दीपक लंके, ज्ञानदेव लंके, बा. ठ. झावरे, बापूसाहेब शिर्के, संभाजी रोहकले, खंडू भुकन, बाळासाहेब खिलारी, मारुती रेपाळे, दादा शिंदे, ऍड. राहुल झावरे, रा. या. औटी, सुवर्णा धाडगे, पूनम मुंगसे, राजेश्वरी कोठावळे, उमाताई बोरुडे, राजश्री खामकर, वैजयंता मते, हिमानी नगरे आदी उपस्थित होते.
प्रदर्शनात राज्यभरातील 130 स्टॉल सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात मुख्यमंत्री सहायता निधी योजनेच्या माध्यमातून 49 तरुण शेतकऱ्यांना पिकअपचे वाटप करण्यात आले असून या माध्यमातून 1 कोटी 27 लाख रुपयांचे अनुदानाचा लाभ या शेतकरांना देण्यात आला.
आ. लंके यांनी, गेल्या अनेक महिन्यांपासून सार्वत्रिक निवडणूक निर्णयाबाबत राज्य सरकार चालढकल करत असून, कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळण्याची शक्यता आहे, असे सांगून मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असल्याने लोकसभा निवडणुकीबाबत शरद पवार निर्णय घेतील. परंतु माझा लोकसभेबाबत विचार करतील की नाही, याबाबतच्या प्रश्नाला आ. लंके यांनी बगल दिली.
सूत्रसंचालन चंद्रकांत मोढवे यांनी करून आभार मानले.
हसन मुश्रीफांना गुंतविण्याचे षङ्यंत्र!
माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठीमागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावून बदनाम करण्याचे षङ्यंत्र या सरकारचे असल्याचा आरोप आ. लंके यांनी केला आहे. कारण दोन वेळा राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांची चौकशी होऊनही सरकार चौकशीचा ससेमिरा लावत आहेत, असे त्यांनी या वेळी सांगितले.