– माधव विद्वांस
हुतात्मा भाई कोतवाल यांचा आज स्मृतिदिन.त्यांचे संपूर्ण नाव विठ्ठल लक्ष्मण कोतवाल. त्यांचा जन्म माथेरान येथे 1 डिसेंबर 1912 रोजी झाला. स्थानिक शाळेत चौथी इयत्तेपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, ते पुणे येथे त्यांच्या मावशी गौरूताई हळदे यांच्याकडे शिक्षणासाठी गेले. तेथे मॅट्रिक परीक्षेत ते संपूर्ण पुणे जिल्ह्यात पहिले आले. त्यानंतर वाडिया महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले व मुंबईत कायद्याचे शिक्षण घेतले. 1941 मध्ये ते वकील झाले. वर्ष 1935 मध्ये त्यांचा विवाह पुण्यातील इंदू तिर्लापूरकर यांच्याशी झाला.
ते साम्यवादी विचारसरणीचे होते. अनेक कम्युनिस्ट नेत्यांप्रमाणे कॉम्रेडऐवजी नावाचे पुढे ‘भाई’ असे लावीत असत. समाजातील अशिक्षितपणा हाच मोठा शत्रू असल्याने त्यांनी सामान्य जनतेतील अज्ञान दूर करण्यासाठी बाळासाहेब ठोसर यांच्या सहकार्याने कर्जत तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून 42 व्हॉलंटरी शाळा सुरू केल्या.
समाज जागृत करण्यासाठी त्यांनी सामाजिक रूढी व जुनाट परंपरा या विरोधात लोकांमध्ये जागृती निर्माण केली. गोरगरिबांची उपासमार थांबविण्यासाठी, भाऊसाहेब राऊत यांचा मदतीने ‘धान्यकोठी’ ही अभिनव योजना सुरू केली. पतपेढी, वाचनालय व व्यायामशाळांच्या माध्यमातून समाज सुसंघटित स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी दुसर्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. तरीही ब्रिटिश भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या मागणीपुढे झुकायला तयार नव्हते. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी हीच वेळ योग्य आहे म्हणून महात्मा गांधीजींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी आझाद मैदान येथील भाषणात ब्रिटिशांना ‘छोडो भारत’चा इशारा दिला आणि अखेरच्या लढ्यासाठी तयार राहण्याचं आवाहन केले, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील लोक भाई कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यामध्ये सामील झाले. त्यातूनच पुढे निधड्या छातीचा कोतवाल गट अर्थात आझाद दस्ता या नावाने ओळखला जाऊ लागला.
शेतकरी, आदिवासी यांच्यासाठी झटत असलेल्या भाईंनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अंगीकारला. रायगड परिसरामध्ये त्यांनी आपल्या क्रांतिकारी कार्याला सुरुवात केली. भाई व त्यांचे साथीदार हिराजी पाटील, भास्कर तांबट, भगत मास्तर, यशवंत क्षीरसागर, बंडोपंत क्षीरसागर, चांदोबा देहेरकर यांनी संदेशवहन व विद्युत पुरवठा करणार्या तारा तोडून, इंग्रजांची दळणवळण व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी तारा वाहून नेणारे डोंगरांवरचे मनोरे पाडायला आरंभ केला.
एका फितुराने दिलेल्या खबरीवरून पोलीस अधीक्षक हॉल स्वतः जातीने 100 सशस्त्र पोलीस घेऊन आला व त्याने 1 जानेवारी 1943 रोजी नेरळजवळील सिद्धगडाला वेढा घातला. गडावरील क्रांतिकारकांना दूध देण्यासाठी जाणार्या गवळ्याचा पाठलाग करत पोलीस गडावर पोहोचले व त्यांनी केलेल्या गोळीबारात 2 जानेवारी 1943 रोजी भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना हौतात्म्य प्राप्त झाले. जखमी भगत मास्तर तिसर्या दिवशी शहीद झाले.