नवी दिल्ली -पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्याच्या उद्देशातून भारत आणि चीनमध्ये उद्या (मंगळवार) लष्करी स्तरावर चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे. संवेदनशील विभागातून सैन्य माघारीसाठीचे निकष त्या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे.
लडाखच्या गलवान खोऱ्यात काही दिवसांपूर्वी भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला. त्यामुळे प्रत्यक्ष ताबारेषेच्या (एलएसी) लगत तणावाची स्थिती आहे. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये याआधी लष्करी स्तरावर चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. त्यापैकी 22 जूनला झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत सैन्यमाघारीबाबत दोन्ही देशांत सहमती झाली.
आता त्यानुसार पावले उचलण्याबाबत तिसऱ्या फेरीत चर्चा होण्याचे संकेत मिळत आहेत. पहिल्या दोन फेऱ्यांतील चर्चा एलएसीलगतच्या चिनी हद्दीत झाल्या. आता तिसरी बैठक भारतीय हद्दीत होणार आहे. त्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग करणार आहेत.