मुंबई – म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलण्य़ात आली आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत आव्हाडांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर भाजपने आव्हाड आणि राज्य सरकारवर टीका केली. तसेच राज्यातील विद्यार्थ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द करण्याचे स्पष्टीकरण दिले आहे. म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला होता. विद्यार्थ्यांची फी परत करणार आहोत, त्याचबरोबर पुढच्या परीक्षेसाठीही फी घेतली जाणार नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे.
म्हाडाच्या पेपरसंदर्भात फक्त एकाच व्यक्तीला माहिती होती, तरीही पेपर कसा फुटला? म्हाडाच्या परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झालाय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आव्हाड म्हणाले. तसेच ही परीक्षा जानेवारी महिन्यात होईल असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. या परीक्षेसाठी आज सकाळच्या सत्रात 50 हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते.
दरम्यान, पेपर फुटल्याचा संशय आल्यानंतर आज राज्यभरात होणारा म्हाडाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. यामागचे कारण असे आहे की, जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर प्रितेश देशमुख व दोन एजंट रात्री विश्रांतवाडी परिसरामध्ये पेपर देण्यासाठी आले होते. तेव्हा पुणे सायबर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर हा पेपर रात्रीतून रद्द करण्यात आला. हा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता. हा पेपर होण्याआधीच पोलिसांच्या जाळ्यात मुख्य सूत्रधार अडकला आहे. याच्यामागच्या सूत्रधाराचा पोलीस शोध घेत आहेत. यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरतीतील अनेक मोठे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्याचबरोबर लष्कर भरतीचाही पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे.