मुंबई – महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडीओद्वारे दिली.
दरम्यान, पत्रकार परिषद घेऊन आव्हाड यांनी पेपर फुटल्याचे मान्य केले. ते म्हणाले, ज्या कंपनीला पेपरचे काम देण्यात आले होते, त्याच्या मालकाचा लॅपटॉप पोलिसांनी तपासला असता त्यामध्ये प्रश्नपत्रिका आढळल्या. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
म्हाडासाठी रविवारी सकाळी कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार तर दुपारीच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची होणारी परीक्षा रद्द करण्यात आली.
या संपूर्ण प्रकारामुळे गोपनीयतेचा भंग झाला, यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यांच्या हुशारीला न्याय मिळाला पाहिजे त्यांना मिळणार नाही, अशी शंका उपस्थित केली गेली. त्यानंतर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पेपर झाल्यानंतर जर पेपर फुटल्याचे समोर आले असते तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरली नसती, अशी कबुली आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पेपर रद्द केला म्हणून अनेक जण टीका करत आहेत, पण भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात कार्यरत पेपर फोडणाऱ्या टोळीला उद्ध्वस्त करावे लागेल. या पेपरबद्दल केवळ एकाच व्यक्तीला माहित होते आणि त्याच व्यक्तीने पेपर फोडला, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. म्हाडाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
जो पेपर संबंधित व्यक्तीला नष्ट करण्यास सांगितले होते, तोच पेपर त्याच्या लॅपटॉपमध्ये आढळला असून हा प्रकार म्हणजे गोपनीयतेचा भंग आहे. यासंदर्भात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वच परीक्षांचे दलाल एकाच टोळीतले आहेत, अशी शंका यावेळी आव्हाड यांनी व्यक्त केली.
परीक्षार्थींना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा मागितली आहे. मात्र अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने तसंच रात्री उशिरा याची माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरला तसंच म्हाडाच्या वेबसाईटवर एका व्हिडीओ पोस्ट केला असून ही परीक्षा आता पुढील वर्षी होणार आहे अशी माहिती दिली.
सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जानेवारीत घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी घराबाहेर पडून केंद्रावर जाऊ नये यासाठी इतक्या रात्री ही माहिती देत आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
चौकट
विद्यार्थ्यांचा संताप
या परीक्षेसाठी पश्चिम महाराष्ट्रातुन कालच हजारो विद्यार्थी मुंबई, पुणे,बारामती आदी विविध केंद्रात पोहचले आहेत. आता त्यांना मध्यरात्रीच्या घोषणेमुळे निष्कारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही घोषणा आधीच किमान कालपर्यंत केली असती तर नाहक धावपळ,त्रास वाचला असता असा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
चौकट
परीक्षा शुल्क परत करणार
म्हाडाच्या जेवढ्या परीक्षा होतील, त्या सर्व म्हाडा घेईल. म्हाडा स्वतः पेपर सेट करेल, परीक्षेची सर्व जबाबदारी म्हाडा घेईल, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. तसेच परीक्षा रद्द केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली. तसेच परीक्षेसाठी घेण्यात आलेली फी म्हाडा विद्यार्थ्यांना परत करेल आणि पुढच्या वेळी जेव्हा पुन्हा परीक्षा घेतली जाईल, त्यावेळी म्हाडा कोणतीही फी या विद्यार्थ्यांकडून घेणार नाही, अशी घोषणा आव्हाडांनी केली.