पुणे – म्हाडाच्या विविध पदांच्या भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कंपनीने साडेतीन वर्षे राज्य परीक्षा परिषदेच्या विविध परीक्षा घेतल्या होत्या. यात अनेक कारणांनी संबंधित कंपनीला लाखो रुपयांचा दंडही ठोठावला होता. दरम्यान, हे आणि अन्य कारनामे पदरी असताना कंपनीला म्हाडाच्या परीक्षेचे कंत्राट मिळालेच कसे?, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
सन 2017 ते 2020 या कालावधीत परीक्षा परिषदेतील टीईटी, शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस, एनटीएस आदी “ओएमआर’ बेस परीक्षा घेण्याचा ठेका जी.ए,सॉफ्टवेअर कंपनीकडे होता. ही कामे कोट्यवधी रुपयांची होती. मात्र, संबंधित कंपनीने प्रत्येक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुकांचा कळस केला होता. परीक्षांचे निकालही लावण्यास सतत विलंब केला जायचा. यामुळे या कंपनीला नोटीस पाठवून खुलासाही मागविण्यात आला होता. त्यावर एक वेळ माफ करा, यापुढे परीक्षा घेताना चुका होणार नाही, अशी विनंतीही कंपनीने परीक्षा परिषदेकडे केली होती.
शिष्यवृत्ती परीक्षेतील चुकांप्रकरणी 90 लाख रुपये, 37 लाख रुपये, 5 लाख रुपये याप्रमाणे प्रत्येक वर्षी जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीला दंड करण्यात आला. टीईटी, एनटीएस, एनएमएमएस या परीक्षांसाठी दंड करण्यात आला होता. या सर्व कारनाम्यांमुळे या कंपनीला काळ्या यादीतही टाकले होते. मात्र नंतर पुन्हा काही “विशेष’ घडामोडी झाल्यानंतर काळ्या यादीतून वगळण्यात आले. त्यानंतर या कंपनीने सरळसेवा भरतीची प्रक्रिया राबविणाऱ्या कंपन्यांत स्थान मिळवले. निविदेची मुदत संपल्यानंतरही सहा महिने याच कंपनीमार्फत काही परीक्षा झाल्या. अखेर कंपनीच्या कामाच्या बिलाची अंतिम रक्कम अदा करण्यापूर्वी प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक परीक्षेत केलेल्या चुकांपोटी दंड वसूल करण्यात आला आहे.
ताकही फुंकुनच प्यावे’ लागणार
म्हाडाच्या पेपर फुटीप्रकरणात जी.ए.सॉफ्टवेअरच्या डॉ. प्रितीश देशमुख याला मुख्य सूत्रधार म्हणून पुणे पोलिसांनी अटक केली. यामुळे परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. “बरे झाले आता या कंपनीकडे परीक्षा परिषदेतील कोणतेच काम नाही. अन्यथा डोकेदुखी वाढली असती,’ असे अधिकारी स्पष्ट सांगत आहेत. त्यामुळे भविष्यात अन्य परीक्षा घेताना खबरदारी बाळगण्यासाठी अधिकाऱ्यांना “ताकही फुंकुनच प्यावे’ लागणार आहे.