- पोलीस आयुक्तांनी केला मीटर डाऊन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवार (दि. 21) पासून रिक्षा चालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी येथील रिक्षा थांब्यावर रिक्षाचा मीटर डाऊन करून रिक्षातून प्रवास करीत या उपक्रमाची सुरुवात केली. दै. प्रभातने “रिक्षा नव्हे शिक्षा’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या मालिकेला यश आले.
पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रिक्षा थांब्यावर या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. यावेळी अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मंचक इप्पर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले, पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, महाराष्ट्र वाहतूक पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे आदी उपस्थित होते.
वाहतूक पोलिसांनी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी मीटर प्रमाणे प्रवास भाडे आकरण्याबाबत चर्चा केली. त्यात रिक्षा संघटनादेखील मीटर प्रमाणे प्रवास भाडे आकारण्याची सकारात्मक असल्याचे सांगितले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, ऑटो रिक्षा ही मीटर प्रमाणे चालायला हवी. स्पर्धेच्या युगात रिक्षा चालकांनी टिकून राहायला हवे.
पोलिसांचे पथक ठेवणार देखरेख
वाहतूक पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. हे पथक शहरात गस्त घालून रिक्षा चालक आणि नागरिकांशी संवाद साधून मीटर बाबत चौकशी करेल. रिक्षाचा मीटर सुरु आहे का, मीटर प्रमाणे भाडे आकारले जात आहे का, याबाबतची चौकशी हे पथक करणार आहे. मीटर प्रमाणे भाडे आकारले जात नसेल तर संबंधित रिक्षा चालकांवर कारवाई केली जाणार आहे.
तक्रारीसाठी हेल्पलाइन नंबर
रिक्षा भाडे, मीटरबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांना तक्रार करता येईल. याबाबत वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने नागरिकांच्या वाहतूक विषयी समस्यांची तक्रार करण्यासाठी 9529681078 हा हेल्पलाइन क्रमांक सुरु केला आहे. त्यावर आता रिक्षा मीटरबाबतच्या तक्रारी देखील करता येणार आहेत.
मीटर रिक्षाचे असे आहेत दर
एक किलोमीटर – 18 रुपये
दोन किलोमीटर – 25 रुपये
तीन किलोमीटर – 37.70 रुपये
पाच किलोमीटर – 67 रुपये
10 किलोमीटर – 123 रुपये
नागरिकांनी शहरातील रिक्षा मीटर प्रमाणे सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे रिक्षा चालविण्यास नकार दिल्यास नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी. त्यानुसार पोलीस कठोर कारवाई करतील.
कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त