श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मंगळवारी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा केला. हालचालींवर निर्बंध घालण्यात आल्यावरून त्यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाबरोबरच केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
काश्मीरमधील स्थिती सुरळित नसल्याचे सांगत प्रशासनाने मला स्थानबद्ध केले. त्यामुळे सर्व काही आलबेल असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. अफगाणिस्तानमधील जनतेच्या हक्कांबाबत केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त केली जाते. मात्र, काश्मिरींचे हक्क डावलले जातात, अशी नाराजी मेहबुबा यांनी ट्विटरवरून व्यक्त केली.
मेहबुबा यांना दक्षिण काश्मीरमधील एका कौटूंबिक समारंभाला उपस्थित रहायचे होते. मात्र, काश्मीरमधील स्थिती बिघडवण्यासाठी काही देशविरोधी घटक प्रयत्नशील असल्याने त्या समारंभाला न जाण्याचा सल्ला प्रशासनाने मेहबुबा यांना दिला.
विभाजनवादी नेते सैद अली शाह गिलानी यांचे मागील आठवड्यात निधन झाले. त्यानंतर काश्मीरमधील स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न काही देशविरोधी शक्तींकडून होण्याची शक्यता ध्यानात घेऊन प्रशासन आणि सुरक्षा दलांनी विशेष सतर्कता बागळली जात आहे.