वडगाव मावळ, – मावळ तालुक्यातील पवना व टाटा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली.
यावेळी याबैठकीस आमदार सुनील शेळके, नारायण ठाकर, नामदेव शेलार, शांताराम लष्करी, नारायण बोडके, निकेतन पालकर, भरत जोरी, मारुती मराठे, विशाल मराठे, संतोष कडू, राम कालेकर, दत्तात्रय ठाकर, संजय खैरे, रविकांत रसाळ, बाळासाहेब काळे आदी उपस्थित होते.
टाटा कंपनीच्या धरणांमुळे मावळ तालुक्यातील सुमारे तेरा गावे पुनर्वसित झाली आहेत. टाटा धरण झाल्यावर विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वस्तीला गावठाण दर्जा देऊन त्याचे पुनर्वसित गावठाण घोषित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या पुनर्वसित गावांना गावठाणाचा दर्जा मिळालेला नसल्याने मूलभूत सोयी-सुविधाही पुरविल्या जात नाहीत. टाटा कंपनीने येथील मुलभुत सुविधा व विकासकामांसाठी सीएसआर फंड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी आमदार सुनील शेळके यांनी केली. तसेच टाटा धरणग्रस्तांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला मिळावा, अशा विविध मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली.
पवना धरणग्रस्तांसाठी अनेक बैठका झाल्या असून पुढील एक महिन्याच्या आत महसूल व वनविभागने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीचे क्षेत्र तात्काळ पुनर्वसन विभागाकडे उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. टाटा धरणातील प्रकल्पग्रस्तांना लवकरच दाखले वाटप करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. वस्त्यांना गावठाण घोषित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.