जगभरातील माध्यमांकडून दखल; इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक
न्यूयॉर्क: भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेची जगभरातील माध्यमांनी प्रामुख्याने दखल घेतली आहे. चंद्राच्या ज्या भागात इस्रोने जायचे धाडस दाखवले त्याबद्दल भारतातूनच नव्हे तर जगभरातून इस्रोचे कौतुक होत आहे. विक्रम लॅंडरचे लॅंडिंग यशस्वी ठरले असते तर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला असता.
चांद्रयान-2 चा लॅंडर मार्गावरुन भरकटलेला असला तरी मोहिमेसाठी सर्व काही संपलेले नाही, असे अमेरिकन मॅगझिन वायर्डच्या ऑनलाइन एडिशनने म्हटले आहे. चंद्रावर उतरणाऱ्या विक्रम लॅंडर आणि त्यातील विक्रम रोव्हरचा तुटलेला संपर्क हा भारताच्या अवकाश कार्यक्रमासाठी एक झटका आहे. पण मोहिमेसाठी सर्व काही संपलेले नाही, असे वायर्डने म्हटले आहे.
जागतिक उदिद्ष्टय डोळ्यासमोर ठेऊन अनेक दशकापासून सुरु असलेल्या भारताच्या अवकाश विकास कार्यक्रमाचे आणि इंजिनिअरींग कौशल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने कौतुक केले आहे. चांद्रयान-2 चा लॅंडर चंद्रावर उतरु शकला नसला तरी ते अंशत: अपयश आहे. ऑर्बिटर कार्यरत राहणार आहे. फक्त चंद्रावर पोहोचणाऱ्या देशांच्या पंक्तीत पोहोचायला भारताला थोडा वेळ लागेल, असे न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले आहे.
चंद्रावर लॅंडिंगची प्रक्रिया सुरु असताना भारताचा लॅंडरबरोबर संपर्क तुटला. भारताच्या वाढत्या अवकाश महत्वकांक्षेला हा धक्का आहे. आतापर्यंत 38 वेळा चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंगचे प्रयत्न झाले त्यातील फक्त निम्म्यावेळा यश मिळाले. चांद्रयान-2 मुळे चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल अशी भारताला अपेक्षा होती. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यशस्वी लॅंडिंग केले आहे, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
विक्रम लॅंडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्यानंतर त्यावेळी सर्वच माध्यमांनी या बातमीला ठळक प्रसिद्धी दिली. 22 जुलैला चांद्रयान-2 अवकाशात झेपावले तेव्हापासून सर्व काही सुरळीत सुरु होते. पण चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना लॅंडर आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटला.