दहशतवाद्यांना पाकिस्तानी म्होरक्यांचे फर्मान
नवी दिल्ली: काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे आहेत. तसे फर्मान दहशतवाद्यांसाठी पाकिस्तानी म्होरक्यांनी जारी केले आहे. दहशतवादी कारवायांमध्ये कमी पडले तर त्यांना बंदुकांऐवजी बांगड्या पाठवल्या जातील, असा इशाराही म्होरक्यांकडून देण्यात आला आहे.
त्याविषयीची माहिती भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी येथे निवडक पत्रकारांशी बोलताना दिली. काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्यासाठी सुमारे 230 दहशतवाद्यांना पाकिस्तानने सज्ज ठेवले आहे. त्यातील काहींनी आधीच घुसखोरीही केली आहे. काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडे केवळ दहशतवाद हेच हत्यार आहे. मात्र, भारतीय सुरक्षा दले सज्ज आहेत. काश्मिरी जनतेच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी भारतीय दले पाकिस्तानी मनसुबे उधळून लावतील, असा विश्वासही डोवाल यांनी व्यक्त केला.