मुंबई – राजकरणात सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेतून बंड केल्यानंतर भाजपसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन केले. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. यानंतर अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे लवकरच महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्यवेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल’, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मुलाखतीत फडणवीस यांना महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकालाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावेळी ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नसल्याने त्यांचे सरकार परत येऊ शकणार नाही. मी वकील असल्याने मी हे सांगू शकतो की, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यांना परत सत्तेत आणून बसवणार नाही. ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पाहिली आहे, त्यांच्याही ही बाब लक्षात आली असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधणे योग्य नाही. पण आमच्या भूमिकेनुसार वाटते की निकाल योग्य पद्धतीने लागेल.”
तसेच फडणवीस-शिंदे सरकारबाबात त्यांनी मोठे भाकीतही केले आहे. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ. त्यामुळे हे सरकार स्थिर आहे. या सरकारमध्ये कोणताही बदल होणार नाही”, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अंजली दमानिया यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते की, “आज मंत्रालयात एका कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गंमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू, आणखीन किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची.” असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं आहे. दमानिया यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले अजित पवार?
अंजली दमानिया यांच्या ट्विटबाबत विचारले असता अजित पवार यांनी, “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार?” अशी प्रतिक्रिया दिली होती.