नवी दिल्ली – तेलंगणातील सत्तारूढ भारत राष्ट्र समिती (BRS) आणि कॉंग्रेसमध्ये मॅच-फिक्सिंग झाले आहे. त्यानुसार, बीआरएसचे प्रमुख के.चंद्रशेखर राव (KCR) यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवायचे. त्याबदल्यात केसीआर यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मदत करायची असे डील त्या पक्षांत झाले आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सोमवारी केला.
तेलंगणातील भाजपच्या (Telangana bjp) प्रचार सभेत बोलताना शहा यांनी बीआरएस आणि कॉंग्रेसमध्ये समझोता झाल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार केला. त्यांनी घराणेशाहीवरून कॉंग्रेस, बीआरएस आणि एमआयएम (MIM) या पक्षांवर टीकास्त्र सोडले. घराणेशाहीवर आधारलेल्या त्या पक्षांचा विश्वास भ्रष्टाचारावर आहे. त्यांना दिलेले मत भ्रष्टाचाराला जाते.
बीआरएस किंवा कॉंग्रेसला (BRS Congress) सत्ता मिळाल्यास विशिष्ट कुटूंबातील व्यक्ती मुख्यमंत्री बनेल. त्याउलट, भाजप सत्तेवर आल्यास मागास जातीतील नेता मुख्यमंत्री बनेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. प्रचारासाठी मी तेलंगणाच्या विविध भागांत फिरलो.
त्यावेळी जनतेमध्ये सत्तारूढ बीआरएसविषयी असलेला रोष मला जाणवला. कुणालाच पुन्हा केसीआर सरकार सत्तेवर यावे असे वाटत नाही, असा दावाही शहा यांनी केला.