कोलोंबो – श्रीलंकेत देशाच्या आर्थिक दुरवस्थेच्या निषेधार्थ सुरू झालेले देखव्यापी जनआंदोलन तब्बल 123 दिवसांनंतर थांबले आहे. या आंदोलनाचा परिणाम म्हणूनच अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. देशात सत्ताबदल झाला असला, तरी आता व्यवस्थेमध्ये बदल होण्यासाठीचा लढा यापुढच्या काळातही सुरूच राहिल, असे आंदोलकांनी म्हटले आहे.
राजपक्षे कुटुंबियांच्याविरोधात आंदोलकांनी गॅले फेस विहारामध्ये 9 एप्रिलपासून धरणे आंदोलन सुरू ठेवले होते. आज सकाळी आंदोलकांनी अधिकृतपणे आंदोलनाचे हे ठिकाण सोडले आणि आंदोलन थांबवले असल्याचे जाहीर केले. गॅले फेस विहारमधून बाहेर पडण्याचा निर्णय आपण एककमताने घेतला आहे. मात्र याचा अर्थ आपला संघर्ष संपलेला आहे, असे मानले जाता कामा नये, असे आंदोलकांचे प्रवक्ते मनोज नानायक्कारा यांनी सांगितले.
देशात लागू असलेली आणीबाणी मागे घेण्यात यावी, नव्याने संसदीय निवडणुका घेण्यात याव्यात आणि अध्यक्षीय पद्धती बंद करण्यात यावी, या मागणीसाठीचा आपला संघर्ष यापुढेही सुरूच राहिल, असेही त्यांनी सांगितले.
विक्रमसिंघेंकडूनही दडपशाही
माजी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे हे अध्यक्ष झाल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यासाठी आंदोलकांवर दबाव येऊ लागला होता. मात्र विक्रमसिंघे यांनी आंदोलन दडपण्यासाठी पोलीस आणि सैन्यबळाचा वापर सुरू केला. अध्यक्षांच्या निवासस्थानात घुसलेल्यांना अटक करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. 22 जुलैला अध्यक्षांच्या सचिवालयातून आंदोलकांना सुरक्षा रक्षकांनी बळाचा वापर करून बाहेर काढले होते. त्यावर श्रीलंकेतील विविध गटांनी टीका केली होती. मात्र सरकारने या कारवाईचे समर्थनच केले होते.