मुंबई : मुंबई गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असूनही मुंबईतील मराठी शाळांची बिकट अवस्था झाली आहे. याच मुद्यावरून भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की,’2010-11 मध्ये मराठी शाळांची संख्या 413 होती आणि विद्यार्थी संख्या 1,02,214 होती. आता सन 2020-2021 मध्ये शाळांची संख्या फक्त 280 राहिली आहे तर विद्यार्थ्यांची संख्या फक्त 36,114 इतकी राहिल्याचं त्यांनी सांगतल आहे.
भाजप आमदार अमित साटम यांनी पत्र
मा. उद्धव ठाकरे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य.
महोदय,
आपणास ज्ञात असेल की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०७ हुतात्म्यांनंतर दि.१ मे १९६० रोजी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबईत असलेले हुतात्मा स्मारक आपणास ‘मराठी माणसाने‘ मराठी बाण्यासाठी दिलेल्या बलीदानाची सदैव आठवण करून देत असेलच!
सत्ताधारी सेनेने मराठी आस्मितेचा आधार घेत गेली तीस वर्षे मुंबई महानगर पालिकेत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली, पण गेल्या तीस वर्षात मुंबईतील मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर फेकला गेला. हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे गेल्या दहावर्षात मराठी शाळांची संख्या आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या निम्म्याहून कमी झाली आहे,याला योगायोगच म्हणावा की मराठीचं नशिब ??
सन २०१० -२०११ मध्ये मराठी शाळांची संख्या ४१३ होती आणि विद्यार्थी संख्या १,०२,२१४ होती. आता सन २०२०-२०२१ मध्ये शाळांची संख्या फक्त २८० राहिली आहे तर विद्यार्थ्यांची संख्या फक्त ३६,११४. मराठी शाळांना सहा-सहा महिने मुख्यध्यापक मिळत नाही. इतकच नाहीतर २०१३ नंतर आवश्यकतेनुसार शिक्षक भरतीही झाली नाही.
आपणास पत्र लिहण्याचे कारण की मला मिळालेल्या माहितीनुसार मराठी भाषेची अशीच अधोगती सुरू राहिली तर २०२७-२०२८ सालापर्यंत मराठी माणसाला आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्या मुलांसाठी एकही मराठी शाळा उपलब्ध राहणार नाही.
ज्या मायमराठीने गेली ३० वर्ष मुंबई महानगर पालिकेत एकहाती सत्ता शिवसेनेला दिली, त्याच मराठीचे हाल बघून मला कविवर्य कुसुमाग्रज यांचे वाक्य आठवते. “मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे”.