Devendra Fadnavis : राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करून जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मनोज जरांगे यांची वाशीमध्ये जाऊन भेट घेत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर त्यांनी हे सरकार घेणारे नाही तर, देणारे सरकार असल्याचे म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 13 मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवर आंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. दरम्यान, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरागेंच्या या मागणीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज (27 जानेवारी) माध्यमांशी बोलताना सांगितले की गुन्हे मागे घेण्याचा आदेश देण्यात आला आहे त्यामध्ये आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले जातील. मात्र, घरे जाळणं, थेट हल्ला करणे, एसटी जाळणे हे गुन्हे न्यायालयाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.
‘मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्याने आनंद, ओबीसींवर अन्याय होणार नाही’ – देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्याने आनंद झाला असल्याचे म्हटले. तसेच पुढे बोलताना त्यांनी मनोज जरांगेचे अभिनंदन केले. तसेच सरकारच्या या अध्यादेशामुळे ओबीसी समाजातील बांधव चिंतेत असतील तर मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो कि ओबीसी बांधवांवर अन्याय होणार नाही,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.