छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल 16 दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढी दीर्घ काळ उपवास केल्यामुळे जरांगेंची तब्येत खालावली आहे.
त्यामुळे वैद्यकीय उपचार, तपासण्यांकरीता अंतरवाली सराटी येथून त्यांना रूग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जरांगे-पाटील यांची उपोषणादरम्यान उपोषण स्थळीदेखील वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. अशात शनिवारी (ता.16) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटील यांच्या सोबत फोनवर चर्चा केली.
वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे, अशी विनंती केली होती. सुरूवातीला मी आंदोलनस्थळीच उपचार घेतो, असे त्यांनी सांगितले होते.
मात्र, नंतर सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे अखेर ते आज रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे. उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांच्या शरीरावर झालेल्या परिणामांची तपासणी रुग्णालयात करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर सर्व चाचण्या करण्यात येणार आहे. या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर पुढील वैद्यकीय उपचार केले जातील.
आंतरवलीत साखळी उपोषण सुरूच !
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे-पाटील व त्यांचे सहकारी उपोषण करत होते. अखेर 17 दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर त्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडले.
जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सोडले असले तरी मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी येथे साखळी उपोषण सुरूच आहे. शासन जोपर्यंत मराठा आरक्षण देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर ते ठाम आहेत.