Manoj Jarange-Patil – येथील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मनोज जरांगे-पाटील यांनी अखेर आज मागे घेतले.
तसेच सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर राज्य सरकारला 2 जानेवारीपर्यंत शेवटची वेळ वाढवून देतो, परंतू दगाफटका झाला तर मुंबईच्या नाड्या आवळू असा इशाराही यावेळी त्यांनी सरकारला दिला.
तर, मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकार गंभीर असून त्यासाठी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलवू असे आश्वासन राज्य सरकारच्या शिष्टमंडळाचे सदस्य राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
जरांगे-पाटलांनी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत होते. त्यात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर राजकीय पुढाऱ्यांसह व्यापारीवर्गाचेही धाबे दणाणले होते.
आता जरांगेंनी उपोषण मागे घेतल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या वतीने कृषी तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, मंत्री उदय सामंत, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे,
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे हे जरांगेंशी चर्चा करण्यासाठी आंतरवालीत दाखल झाले होते.
चर्चेअंती जरांगे सरकारला केवळ 24 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यावर ठाम दिसत होते परंतू अखेर मंत्री मुंडेंनी त्यांना हात जोडून वेळ वाढवून देण्याची विनंती केल्यानंतर “मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मिळालं परंतू
राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी सरकारला वेळ वाढवून देत असल्याचे’ म्हणत जरांगेंनी उपोषण मागे घेतले. त्यामुळे सरकारकडून गेलेल्या शिष्टमंडळाला मोठं यश आले आहे.
जरांगे काय म्हणाले…
– मराठ्यांना न्याय देण्यासाठी सरकारला वेळ देण्याचा निर्णय
– आरक्षण न दिल्यास मुंबईत धडकणार
– लेकराची शपथ घेऊन सांगतो पण सरकारच्या बाजूने कधीच जाणार नाही
– राज्यभर काम करण्यासाठी सरकारला दीड ते दोन महिने पाहिजे, तोपर्यंत मीही तयार होईल.
– मराठा जातीवर पिढ्यान पिढ्या अन्याय झाला.
– चांगल्या चांगल्यांना क्लिनचीट मिळाली मग आमच्या कार्यकर्त्यांचे गुन्हे मागे का नाही
– पुरावे नसताना देखील माळी, तेली, लिंगायत समाज ओबीसीत घातले मग मराठ्यांचा दोष काय?