Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या 20 जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी मुंबईला पायी प्रवासाची तयारी करावी, असे आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी निर्णायक लढा पुकारला असून, अंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती नुकतीच जरांगे यांनी दिली. 20 जानेवारीला सकाळी 9 अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्यांनी या पायी मोर्चात सहभागी व्हायचं आहे. असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.
आज जरांगेंचे शिष्टमंडळ मैदानाची पाहणी करण्यासाठी मुंबईत पोहचले आहे. जर आंदोलनासाठी परवानगी मिळाली नाही तर मुंबईतच आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच यावेळी जरांगे यांनी राज्यातील सर्व मराठा समाजाला आंदोलनस्थळी येत मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंब देण्याची विनंती केली आहे.
मराठा समाजाने गट-तट ठेवू नयेत. सर्वांनी एकत्र यावे हा गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या भविष्याचा विषय आहे असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा आंदोलकांना मोठ्या संख्येने मैदानांची आवश्यकता भासणार आहे त्यासाठी सर्वजण तयारी करत आहोत असे जरांगे यांनी सांगितले. तसेच, यावेळी मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांना थेट इशारा दिला आहे.
मनोज जरांगे म्हणाले, ’20 जानेवारीला मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईत येणार असून जर सरकारने आमची वाहने अडवली तर आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात बसू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आमची वाहने अडवली तर आम्ही आमचे सामान कशात नेणार.
आम्हाला मुंबईत राहण्यासाठी निवारा, दैनंदिन जीवनाच्या गोष्टी लागणार आहेत त्यासाठी आम्ही ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन मुंबईत येणार आहोत. आम्ही त्यात दगड भरुन आणणार नाही. त्यामुळे सरकार आपल्यावर कारवाई करेल. आपली वाहने जप्त करेल याविषयी मराठ्यांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.