Manoj Jarange : राज्यातील मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात मराठा आंदोलन पेटणार असल्याचे दिसत आहे. त्यापूर्वी उद्या म्हणजेच 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil) सभा आयोजित करण्यात आली आहे.
सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकर परिसरात ही सभा होणार आहे. या सभेतून जरांगे पाटलांचा इशारा नेमका सरकारला काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र, त्यापूर्वी जरांगे पाटील यांची परभणीतील सेलू इथं जाहीर सभा झाली. या सभेला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.
तसंच मुंबईला येण्याआधी पोलिसांनी मराठा आंदोलकांना नोटीसा दिल्या. त्यावर जरांगेंनी भाष्य केलं आहे. “आम्ही कुठं म्हटलं आम्ही मुंबईला जाणारंय? पण जायचं असेल तर मुंबई आमची नाही का? आम्हाला पण शहर बघायचंय, तुम्हाला अडचण कसली आहे?, असा खडा सवाल मनोज जरांगे यांनी सरकारला केला.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “आम्हाला जायचे नाही. पण जायचे ठरले तर काय? मुंबई आमची नाही का? आम्ही मुंबई पाहायची नाही का? मुंबईतील शेअर मार्केट पाहायचे नाही का? मंत्र्यांचे बंगले कसे आहेत पाहू या? हिरो-हिरोईन यांचे बंगले पाहू द्या. जर कोणाला अटक केली तर सर्वच जण त्या पोलीस ठाण्यात जाऊन बसा. लाखोच्या संख्येने जाऊन बसा.
सरकारने खेटायचे ठरवले तर खेटू द्या. सध्या एकही नेता मराठ्यांच्या बाजूला उभ राहायला तयार नाही. ज्याला मोठ केलं तोच म्हणतो, आरक्षण मिळू देणार नाही, सावध व्हा. जाता जाता पायाला हात लाऊन सांगतो, अशीच एकजूट ठेवा. आधी आपले पोर, जातीपेक्षा नेता मोठा नाही. आपल्या लेकरापेक्षा कोणी मोठा नाही. मला तुमच्या साथीची गरज आहे. पाठबळ हवेय आहे. मी मारायला भीत नाही’. असं जरांगे यावेळी म्हणाले.