Bajrang Punia To PM Modi : भारतीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने पंतप्रधान मोदींना एक लांबलचक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने आपल्या मागण्या ऐकल्या जात नसल्याने पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीपासूनच भारतीय कुस्तीपटूंचा एक भाग भारतीय कुस्ती महासंघातील ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या मनमानी आणि हुकूमशाहीचा निषेध करत आहे. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपचे खासदार आहेत आणि दीर्घकाळ भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष राहिले आहेत.
नुकतेच पैलवानांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले. मात्र, ज्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे, तेही ब्रिजभूषण यांच्या कॅम्पचेच (निकटवर्तीय) आहेत. अशा स्थितीत गेल्या 11 महिन्यांपासून सुरू असलेले कुस्तीगीरांचे आंदोलन पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहे. यामुळेच बजरंग पुनियाने आपले पदक (पद्मश्री पुरस्कार) परत करण्याची घोषणा केली आहे.
आंदोलन पूर्णपणे निरर्थक राहिल्यानंतर आणि केंद्र सरकारने महिला कुस्तीपटूंच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्याने भारताची ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक हिनेही काल कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्या नेतृत्वाखाली ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते. जानेवारीपासून सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये आतापर्यंत बरेच काही घडले आहे.
बजरंग पुनियाने पत्रात काय लिहिले?
बजरंग पुनिया याने पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की ,”तुम्हाला माहिती असेलच की, या वर्षी जानेवारी महिन्यात देशातील महिला कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे प्रभारी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. त्या महिला कुस्तीपटूंनी जेव्हा आंदोलन सुरू केले, तेव्हा मी देखील सामील झालो. सरकारने ठोस कारवाई करण्याचे सांगितल्यावर आंदोलक पैलवान जानेवारीत आपापल्या घरी परतले. पण तीन महिने उलटूनही जेव्हा ब्रिजभूषण विरोधात एफआयआर दाखल झाला नाही, तेव्हा एप्रिल महिन्यात आम्ही कुस्तीपटू पुन्हा रस्त्यावर उतरलो आणि दिल्ली पोलिसांनी किमान ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एफआयआर नोंदवावा, यासाठी आंदोलन केले, पण तरीही काम झाले नाही., म्हणून आम्हाला कोर्टात जाऊन एफआयआर नोंदवावा लागला.
‘आमचा पाठलाग करण्यात आला, आंदोलनावर बंदी घालण्यात आली’
पुनिया लिहितात की, ‘जानेवारीमध्ये तक्रारदार महिला कुस्तीपटूंची संख्या 19 होती, जी एप्रिलपर्यंत 7 वर आली, म्हणजेच या तीन महिन्यांत ब्रिजभूषण सिंह यांनी आपल्या ताकदीच्या जोरावर 12 महिला कुस्तीपटूंना आंदोलनातून माघार घेण्यास भाग पाडले. न्यायासाठी.. हे आंदोलन 40 दिवस चालले. या 40 दिवसांत आणखी एक महिला कुस्तीगीर मागे हटली आम्हा सर्वांवर खूप दबाव होता. आमची निषेधाची जागा उद्ध्वस्त करण्यात आली आणि आमचा दिल्लीतून पाठलाग करण्यात आला आणि आमच्या आंदोलनावर बंदी घालण्यात आली.
‘आम्ही पदक गंगेत टाकण्याचा विचार केला’
पुनिया यांनी पुढे लिहिले आहे की, ‘जेव्हा हे घडले तेव्हा आम्हाला काय करावे हे सुचत नव्हते. त्यामुळेच आम्ही आमची पदके गंगेत टाकण्याचा विचार केला. तिथे गेल्यावर आमचे प्रशिक्षक साहिबान आणि शेतकऱ्यांनी आम्हाला तसे करू दिले नाही. त्याचवेळी तुमच्या एका जबाबदार मंत्र्याचा फोन आला आणि तुम्ही परत या, तुम्हाला न्याय दिला जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, आम्ही आमच्या गृहमंत्र्यांचीही भेट घेतली, ज्यात त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ते महिला कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी पाठिंबा देतील आणि ब्रिजभूषण, त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या कुस्तीगीरांना कुस्ती महासंघातून काढून टाकण्यात येईल. त्यांचा सल्ला आम्ही मान्य करत रस्त्यावरून आमचे आंदोलन संपवले, कारण सरकार कुस्ती संघाचा प्रश्न सोडवेल आणि न्यायाचा लढा न्यायालयात लढेल, या दोन गोष्टी आम्हाला तर्कसंगत वाटल्या. मात्र 21 डिसेंबर रोजी झालेल्या कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत ब्रिजभूषण यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. ‘वर्चस्व आहे आणि वर्चस्व राहणार’ असे विधान त्यांनी केले.
‘लैंगिक शोषणाचा आरोपी वर्चस्वाबद्दल बोलतोय’
पुनियाने पुढे लिहिले आहे की,’ महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोपी पुन्हा उघडपणे कुस्तीचे व्यवस्थापन करणाऱ्या संघावर आपले वर्चस्व असल्याचा दावा करत होता. याच मानसिक दडपणाखाली ऑलिम्पिक पदक जिंकणारी एकमेव महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती घेतली. आम्ही सर्व रात्र रडत घालवली. कुठे जायचं, काय करायचं, कसं जगायचं हे समजत नव्हतं. सरकार आणि जनतेने खूप आदर दिला. या आदराच्या ओझ्याखाली गुदमरत राहावं का?
मैं अपना पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्री जी को वापस लौटा रहा हूँ. कहने के लिए बस मेरा यह पत्र है. यही मेरी स्टेटमेंट है। 🙏🏽 pic.twitter.com/PYfA9KhUg9
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) December 22, 2023
‘मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करत आहे’
पुनिया यांने लिहिले आहे की, ‘वर्ष 2019 मध्ये मला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. तसेच खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं. हा सन्मान मिळाल्यावर मला खूप आनंद झाला. असे वाटत होते की जीवन यशस्वी झाले आहे. पण आज मी त्याहून अधिक दुःखी आहे आणि हे सन्मान मला दुखावत आहेत. एकच कारण आहे, ज्या कुस्तीसाठी आम्हाला हा मान मिळतो, त्यामध्ये आमच्या सहकारी महिला कुस्तीपटूंना त्यांच्या सुरक्षेसाठी कुस्ती सोडून द्यावी लागतं आहे. खेळामुळे आपल्या महिला खेळाडूंच्या जीवनात प्रचंड बदल घडून आला. पूर्वी ग्रामीण भागात मुलं-मुली एकत्र खेळताना दिसतील याची कल्पनाही ग्रामीण भागात करता येत नव्हती. पण पहिल्या पिढीतील महिला खेळाडूंच्या धाडसामुळे हे घडू शकले. तुम्हाला प्रत्येक गावात मुली खेळताना दिसतील आणि त्या खेळण्यासाठी देश-विदेशातही जात आहेत. पण ज्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे किंवा कायम राहणार आहे, त्यांची सावलीही महिला खेळाडूंना घाबरवते आणि आता त्यांनी पुन्हा पूर्ण ताबा मिळवला आहे, त्यांच्या गळ्यात फुले आणि हार घातलेला त्यांचा फोटो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. बेटी बचाओ बेटी पढाओच्या ब्रँड अॅम्बेसेडर बनणाऱ्या मुलींना अशा परिस्थितीत टाकण्यात आले की, त्यांना त्यांच्या खेळापासून मागे हटावे लागले आहे. तरीही आम्ही “सम्मानित” पैलवान काही करू शकलो नाही. महिला कुस्तीपटूंचा अपमान केल्यानंतर मी माझे आयुष्य “सन्माननीय” म्हणून जगू शकणार नाही. असे जीवन मला आयुष्यभर त्रास देईल. म्हणूनच हा “सन्मान” मी तुम्हाला परत करत आहे.