कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर दहा महिन्यांनी झालेल्या तेथील नगरपालिका निवडणूकीत सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसने बुधवारी विरोधकांचा पुन्हा एकदा सफाया करीत 107 पैकी 93 नगरपालिका जिंकल्या आहेत. अन्य सात नगरपालिकांमध्येही तृणमुल कॉंग्रेसच आघाडीवर आहे. विरोधी पक्षनेते आणि नंदीग्रामचे भाजप आमदार सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला असलेली कांठी नगरपालिकाही टीएमसीने जिंकली, तर राजकारणात नव्याने प्रवेश केलेल्या हमरो पार्टीने दार्जिलिंग नगरपालिकेत विजय मिळवला आहे.
सीपीआय (एम) च्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने नादिया जिल्ह्यातील ताहेरपूर नगरपालिका जिंकली.काही शहरांमध्ये विरोधी पक्षांनी काही प्रभाग जिंकले असले तरी भाजप आणि कॉंग्रेसला अद्याप एकही नगरपालिका जिंकता आलेली नाही.27 नगरपालिकांमध्ये तृणमुल कॉंग्रेसने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत.
मुर्शिदाबादमधील बेलडांगा, पुरुलियातील झाल्डा, हुगळीमधील चंपदानी आणि पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रा या किमान चार नगरपालिका त्रिशंकू बनल्या आहेत. तेथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. तेथील सत्तेची सूत्रे अपक्षांकडे गेली आहेत.
गेल्या चार दशकांपासून अधिकारी कुटुंबाच्या प्रभावाखाली असलेली कांठी नगरपालिका टीएमसीने बळकावल्याने सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे. कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा नगरपालिका टीएमसीने या आधीच बिनविरोध जिंकली आहे.