नव्वदच्या दशकात भारतीय समाजव्यवस्थेमध्ये “ब्रेनड्रेन’ हा शब्द मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता. भारतीय शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थी नोकरी करण्यासाठी अमेरिकेत किंवा युरोपमधील देशांमध्ये जात असल्यामुळे त्या प्रक्रियेला “ब्रेनड्रेन’ अशी संज्ञा दिली जात असे.
भारतात त्यांच्या शिक्षणाला आणि गुणवत्तेला योग्य न्याय मिळण्याची खात्री नसल्याने अनेक विद्यार्थी अशा प्रकारे परदेशात नोकरीच्या शोधात जात होते. आतापर्यंत हा शब्द फक्त शिक्षण आणि नोकरी या संबंधात वापरला जात असला तरी आता भारतीय क्रिकेटसाठीसुद्धा हा शब्द वापरावा लागणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेटपासून निवृत्ती घेऊन अमेरिकेतील लीग स्पर्धेमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 2012 मध्ये अंडर 19 विश्वचषक स्पर्धा जिंकून देणाऱ्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद याने भारतीय क्रिकेटला रामराम ठोकून अमेरिकेतील एका स्थानिक लीगतर्फे खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
याच संघातील एक गोलंदाज हरमन सिंग यानेही तोच निर्णय घेतला आहे. त्याशिवाय मनन शर्मा, भूषण द्विवेदी, मिलिंद कुमार अशा अनेक खेळाडूंनी गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अमेरिकेतील लीगशी नाते जोडले आहे. भारतीय क्रिकेटचे नियंत्रण करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी या प्रकरणाची गंभीर दखल त्यांना घ्यावीच लागणार आहे.
कारण गुणवत्ता असूनही भारतात खेळण्यासाठी संधी उपलब्ध नसल्याने जर गुणी खेळाडू अशाप्रकारे भारत सोडून परक्या देशात जात असतील, तर त्याचा विचार करावाच लागणार आहे. आतापर्यंत इतर देशांमध्ये अशा घटना घडल्या आहेत; पण अशा प्रकारचे ब्रेनड्रेन भारतात प्रथमच होताना दिसत आहे. पाकिस्तानमधील अनेक खेळाडू तेथे क्रिकेटचे वातावरण पोषक नसल्याने इंग्लंडसारख्या देशात स्थलांतरित झाले आहेत.
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील अनेक खेळाडूही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा इंग्लंडकडून खेळताना दिसत आहेत. अशीच परिस्थिती आता भारतासाठी होताना दिसत आहे. सध्याचा इंग्लंड संघातील एक खेळाडू हमीद हासुद्धा पूर्वाश्रमीचा भारतीय असून गुजरातमध्ये योग्य संधी उपलब्ध न झाल्याने त्याने इंग्लंडमध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याला इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये स्थान मिळाले आहे.
एकीकडे भारतीय क्रिकेटच्या राखीव फळीचे कौतुक होत असताना ही दुसरी बाजूही समोर येत आहे. उन्मुक्तसारख्या गुणवान खेळाडूंची अनेक वर्षे वाया गेल्याने अखेर वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी हा निर्णय घ्यावा लागला. गुणवान क्रिकेटपटूंना संधी देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतानाही अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत, याचा विचार आता करावाच लागणार आहे. विविध प्रकारचे रणजी संघ,
आयपीएल क्रिकेट स्पर्धा या निमित्ताने अनेक क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी मिळते. त्यांनी या संधीचे सोने केले तर त्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळू शकते हे सूर्यकुमार यादवसारख्या युवा खेळाडूंनी सिद्ध केले आहे. सूर्यकुमार यादव यालाही उशिरा संधी मिळाली आहे; पण चिकाटी चांगली असल्याने अखेर त्याने केलेल्या परिश्रमाचे सोने झाले. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये खेळत असताना भारताचा दुसरा क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता.
एकाच वेळी किमान 30 जणांना राष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळाले असले, तरीही अद्याप तेवढेच गुणवंत खेळाडू बाहेर वाट पाहात उभे आहेत, हे वास्तवही नाकारता येणार नाही. काही वर्षांपूर्वी भारतीय संघातर्फे त्रिशतकी खेळी करणारा करुण नायर हा गुणी खेळाडू सध्या कोठे आहे, त्याचा शोध घ्यावा लागेल. अनेक गुणी खेळाडू केवळ योग्य संधी न मिळाल्याने निवृत्ती तरी स्वीकारत आहेत किंवा एखाद्या परदेशातील लीगतर्फे खेळण्याचा पर्याय निवडत आहेत.
जे खेळाडू अंडर19 संघातर्फे भारताचे प्रतिनिधित्व करतात त्यापैकी अनेकांना भारतीय क्रिकेट संघामध्ये स्थान मिळते हे आतापर्यंत विराट कोहली, महंमद कैफ, शिखर धवन, युवराज सिंग यासारख्या खेळाडूंनी सिद्ध केले आहे. पण उन्मुक्त चंद यापासून का वंचित राहिला याचा शोधसुद्धा घ्यावा लागणार आहे. प्रसारित झालेल्या बातम्यांप्रमाणे उन्मुक्त खूपच लवकर स्टार झाल्याने त्याला त्याचा फटका बसला.
खरेतर त्याच्याकडे भारतीय क्रिकेट संघाचा भावी कॅप्टन म्हणून पाहिले जात होते. काही वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांची एक जाहिरातही प्रसिद्ध झाली होती. यामध्ये विराट आणि उन्मुक्त यांचे भावी कर्णधार म्हणून वर्णन करण्यात आले होते. त्यापैकी विराट कोहली आता अत्यंत यशस्वीपणे भारतीय क्रिकेटचे कर्णधारपद भूषवत असताना उन्मुक्त चंद मात्र दुसऱ्या देशाकडून खेळायला जात आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता भरली आहे.
फलंदाजी आणि गोलंदाजी या सर्वच क्षेत्रांमध्ये अनेक गुणवान खेळाडू समोर येत आहेत. या सर्वच खेळाडूंना योग्य वेळी योग्य संधी द्यायची असेल तर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला एखाद्या विशिष्ट धोरणाची रचना करावी लागेल. ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये कोटा सिस्टिमने काही खेळाडूंना संधी दिली जाते. त्या कोटा सिस्टिमचा वापर आता भारतासाठीही करण्याची वेळ आली आहे. मोठ्या दौऱ्यामध्ये जर पाच सामने खेळले जात असतील तर त्यापैकी प्रत्येक सामन्यांमध्ये जर वेगळे खेळाडू खेळवण्यात आले तर अनेक खेळाडूंना संधी मिळू शकते.
जो आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करतो त्याला कायमस्वरूपी स्थानही मिळू शकते. उन्मुक्त अमेरिकेतील ज्या क्रिकेटमध्ये खेळत आहे त्या स्पर्धेमध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने धडाकेबाज अर्धशतक करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे, ही बाब आता अधोरेखित होण्यासारखी आहे.
पुढे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कदाचित क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता असल्याने अमेरिकेने आतापासूनच क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आहे आणि विविध देशांमधून जर गुणवान खेळाडू अमेरिकेला मिळत असतील, तर ते त्यांना हवेच आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आपल्या आगामी क्रिकेट विषयक धोरणाचा विचार करावा लागणार आहे. भारतीय क्रिकेटमधील हे ब्रेनड्रेन फारसे सुखावह नाही, हे निश्चित.