मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नुकतीच बैठक झाली. या बैठकीत रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबात चर्चा झाली असल्याचीही माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
मुंबईत बुधवारी संध्याकाळी त्यांनी भाजपच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. तसेच महाराष्ट्र आणि मुंबई भाजपच्या काही बैठकाही त्यांनी घेतल्या. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुंबई महानगर पालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू करण्यात आल्याचे दिसू लागले आहे. या बैठकीत रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबात चर्चा झाली असल्याचीही माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे.
उदय सामंत म्हणाले, जे. पी नड्डा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शिवसेनेचे मुख्यनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे नेते आहेत. त्यांच्यात जी चर्चा झाली ती महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने, निवडणुकांच्या दृष्टीने, कदाचित मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भात असेल. पण या तीन मोठ्या नेत्यांची चर्चा काय झाली हे मला माहिती नाही. त्यामुळे त्यावर मी बोलणे उचित नाही, असा खुलासा त्यांनी केला.
दरम्यान, काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेक संभाव्या तारखा जाहीर झाल्यानंतरही विस्तार होऊ शकला नाही. तसेच, शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलल्याने महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला जोर आला आहे.