पुणे -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा यंदा दहावीचा निकाल तब्बल 99.95 टक्के लागला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा हा सर्वात उच्चांकी निकाल ठरला. 957 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले.
मुलांपेक्षा मुलींनी निकालात बाजी मारण्याची परंपरा कायम ठेवली आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के तर सर्वात कमी नागपूर विभागाचा 99.84 टक्के निकाल लागला आहे. दरम्यान पुणे बोर्डाचा निकाल 99.96 टक्के एवढा लागला आहे.
राज्य मंडळाची दहावीची परीक्षा 29 एप्रिल 20 मे या कालावधीत घेण्यात येणार होती. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने 12 मे रोजी घेतला होता. त्यानंतर 28 मे रोजी दहावीच्या निकालाचा मूल्यमापन आराखडा जाहीर करण्यात आला होता. इयत्ता नववीसाठी 50 टक्के व दहावीसाठी 50 टक्के याप्रमाणे 100 टक्के गुणांनुसार अंतर्गत मूल्यमापन करून निकाल तयार करण्यात आले.
राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यावेळी राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले, पुणे बोर्डाच्या सहसचिव प्रिया शिंदे आदी उपस्थित होते. या परीक्षेसाठी नऊ विभागीय मंडळातील 22 हजार 767 शाळांमधील एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यात 15 लाख 75 हजार 806 नियमित विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा समावेश होता.
त्यापैकी 15 लाख 75 हजार 752 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन शाळांकडून प्राप्त झाले आहे. त्यातील 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. परीक्षेत एकूण 82 हजार 802 पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील 82 हजार 674 विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्राप्त झाले आहे.
त्यातील 74 हजार 618 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 90.25 टक्के आहे. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 28 हजार 424 एवढी असून त्यांचा निकाल 97.45 टक्के लागला आहे. राज्यातील 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, 6 लाख 98 हजार 885 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 2 लाख 18 हजार 70 विद्यार्थी.
राज्यातील शाळांनी मूल्यमापन करुन वेळेत राज्य मंडळाच्या पोर्टलवर गुण नोंदविले. शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व विभागीय मंडळातील अधिकारी, कर्मचारी यांनी करोनाच्या संकटातही वेळेत कामे पूर्ण केली. यामुळे इतर बोर्डाच्या तुलनेत राज्य मंडळाचा निकाल सर्वात आधी लावण्यात यश मिळाले आहे.
– दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ