नवी दिल्ली – देशात सर्वात चांगली आरोग्य सेवा देण्यात केरळ अव्वल ठरला आहे. तर उत्तर प्रदेश सर्वात खराब आरोग्य सेवा देणारे 19वे राज्य ठरले आहे. नीती आयोगाने “हेल्थ इंडेक्स रॅंकिंग’ प्रसिद्ध केली आहे. यामध्ये दक्षिणेकडील राज्यांनी बाजी मारली आहे. महत्त्वाचे म्हणजे
महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेतही सुधारणा झाली असून राज्याने पाचवा क्रमांक मिळविला आहे.
देशात आजपर्यंत सर्वाधिक करोनाचे रुग्ण ज्या राज्यात सापडले त्या केरळ राज्याचा हेल्थ इंडेक्समध्ये पहिला क्रमांक आला आहे. आरोग्यसेवा देण्यात केरळ चारवेळा अव्वल स्थानावर आहे. 2015-16, 2017-18 आणि 2018-19 या साली केरळ पहिल्या स्थानावर आहे. केरळनंतर तामिळनाडू आणि तेलंगाणाचा नंबर लागतो. देशाचे सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशची परिस्थिती सर्वात खराब आणि स्थान खालचे असल्याची आकडेवारी निती आयोगाने मांडली आहे.
छोट्या राज्यांमध्ये चांगल्या आरोग्य सेवा देण्याच्या बाबतीत मिझोरम पहिल्या क्रमांकावर, त्रिपुरा दुसऱ्या आणि नागालॅंड खालच्या स्थानावर आहे. तर केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली प्रथम, चंदीगड दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला तर दरवर्षी दिल्लीचा क्रमांक घसरत आहे.
निती आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, हेल्थ इंडेक्सने चार फेऱ्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. चारही फेऱ्यात केरळ टॉपवर आहे. केरळचे गुण 82.20 आहे. तर तामिळनाडूचे 72.42 आहे. या यादीत सर्वात कमी गुण उत्तरप्रदेशला 30.57 आहे.