मुंबई – पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत यांनी आर्थिक घोटाळा केला असल्याचा ठपका ठेवत ईडीने त्यांना अटक केली असून ते सध्या न्यायलयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी संजय राऊत यांना कोर्टात आणण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी आणि शिवसैनिकांशी संवाद साधला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, शिवसेना पक्षाचे नवीन चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल आणि भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. आमच्यात शिवसेनेचं ‘स्पिरीट’ आहे. खरी शिवसेना कोणती आहे, हे लोकांना माहित आहे. त्यामुळे चिन्ह बदललं तरी लोक आपल्याशी जोडले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आज खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 7 दिवसांनी वाढवली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी राऊतांची न्यायालयीन कोठडीही संपत असल्याने त्यांना आज कोर्टापुढे हजर करण्यात आले. परंतु न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही आणि त्यांची न्यायालयीन कोठडी 17 ऑक्टोबरपर्यंत वाढवली.