मुंबई : काही लोक समाजात दंगली निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत महाराष्ट्राच्या सामर्थ्याविषयी बोलताना गरज पडली दिल्लीत कोणालाही टक्कर देण्याची धमक महाराष्ट्रात आहे असे पवार यांच्या नमूद केले आहे. अजित पवार यांच्या हस्ते जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रेरणा मिळते. त्यांचा आदर्श ठेवूनच आपल्याला पुढे जायचं आहे. देशावर दिल्लीवर संकट आलं, त्या त्यावेळी महाराष्ट्र देशाच्या रक्षणासाठी धावून गेल्याचा इतिहास आहे. यापुढं देखील, आपल्या देशावर जेव्हा, जेव्हा संकट येईल, देश वाचवण्यासाठी वेळ येईल तेव्हा महाराष्ट्र नक्की मदतीला धावून जाईल असा विश्वास आहे.”
“गरज पडली तर महाराष्ट्र दिल्लीत कोणालाही टक्कर देईल. ही धमक महाराष्ट्रात आहे असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तो विसरता येणार नाही. शरद पवार नेहमी सांगतात, महाराष्ट्र कधी कोणासमोर झुकलेला नाही. यापुढं झुकणार देखील नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन पुढं जायचं आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.