मुंबई: राजस्तानातील कोटा येथील विविध शिक्षण संस्थांमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील दोन हजार विद्यार्थी परत आणण्यासाठी राज्य सरकारने तिकडे शंभर बसेस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली. या बसेस राज्य परिवहन मंडळाच्या असून त्या येत्या दोन दिवसांत कोटाकडे पाठवल्या जाणार आहेत असे परब यांनी सांगितले.
बारावी नंतरच्या विविध स्पर्धा परिक्षांच्या शिकवणुकीसाठी हे विद्यार्थी तिकडे गेले आहेत. त्यांना परत आणण्याची मागणी त्यांच्या पालकांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अलीकडेच केली होती. या विद्यार्थ्यांना प्रथम धुळे येथे आणण्यात येईल. आणि तेथून त्यांना आपआपल्या गावी बसेस मधून पाठवले जाणार आहे. या बसेसच्या प्रवासासाठी राजस्तान सरकार, मध्यप्रदेश सरकार यांच्यामार्फत योग्य ती व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठीच्या परवानग्याही घेण्यात आल्या आहेत. नियमानुसार या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना चौदा दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे.