मुंबई – राज्यातील करोनाची तीसरी लाट ओसरली असून राज्यात शुक्रवारी केवळ 2068 नवे रुग्ण आढळले आहेत तर 4709 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत करोनामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 21हजार 159 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात 76 लाख 86 हजार 670 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.85 टक्के इतके झाले आहे. मागील 24 तासांत राज्यात 15 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे. दरम्यान, राज्यात आजपर्यंत सात कोटी 70 लाख एक हजार 972 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,55,359 (10.20 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 37 हजार 252 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1 हजार 139 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत 4456 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 3531 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. आजपर्यंत एकूण 8904 नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी 7991 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. 931 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.