कोल्हापूर(प्रतिनिधी)- सोमवारी कोल्हापुरातील व्यापार सुरू झाल्याचा आनंदोत्सव करणे कोल्हापूरातील व्यापाऱ्यांना चांगलाच भोवलं आहे. राजरामपुरीमध्ये बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणूक काढणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्यासह 13 बड्या व्यापाऱ्यांवर कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दि . 20 जुलै 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी 17 जुलै 2021 रोजी कोरोना प्रतिबंधक विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी जारी केलेल्या आदेशाचा भंग करून बैलगाडीतून राजारामपुरी परिसरातून मिरवणूक काढल्याप्रकरणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष ललित गांधी यांच्यासह 13 जणांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यासंदर्भात फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय यशवंत पाटील यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
याप्रकरणी ललित गांधी , अनिल पिंजानी , शाम बसराणी, दीपक पुरोहित, अभिजित गुजर, प्रताप पोवार, प्रशांत पोकळे , रहिम सनदी, दर्शन गांधी, गजानन पवार, महेश जेवरणी, सतीश माने, भरत रावळ अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे असून या सर्वांनी दिनांक 19 जुलै रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास राजारामपुरी जनता बाजार चौक ते मारुती चौक आणि बस रूट मार्गावर गर्दी जमवून बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय दंड संहिता कलम 188, 269, 270 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 51 ब आणि साथीचे रोग अधिनियम कलम 2,3,4 सह महाराष्ट्र covid-19 विनिमय कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.