केंद्र सरकारने चित्ररथाला परवानगी नाकारली
नवी दिल्ली : दरवर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट दरम्यान राजपथावर होणाऱ्या यंदाच्या पथ संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ बघायला मिळणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयानं महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे. यंदाचा महाराष्ट्राचा चित्ररथ हा मराठी रंगभूमीची 175 वर्षे या संकल्पनेवर साकारण्यात येणार होता.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला राजपथावर पथ संचलन होत असते. यात विविध राज्ये आणि मंत्रालयाचे चित्ररथांचा समावेश असतो. यात महाराष्ट्राचाही असतो. महाराष्ट्राच्या चित्ररथाने 2015 नंतर दोनदा पहिल्या क्रमांकाचा मान मिळविला होता, हे येथे उल्लेखनीय.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनी निवडक राज्यांचे चित्ररथ दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनामध्ये सहभागी होत असतात. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ या पथसंचलनामध्ये सहभागी होत होता. गेल्या पाच वर्षांत दोनदा महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला होता. या वर्षी मराठी रंगभूमीची 175 वर्षे या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात येणार होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही.
संरक्षण मंत्रालयाकडे एकूण 56 चित्ररथांचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी चित्ररथांचे 22 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
त्यात 16 राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांचे, तर सहा केंद्रीय मंत्रालयांतील चित्ररथ आहेत. मंत्रालयाकडे एकूण 32 प्रस्ताव हे राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आले होते. तर अन्य 24 प्रस्ताव हे विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांकडून आले होते. त्यापैकी 22 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
पाच बैठकांनंतर त्यातील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे 16 आणि मंत्रालये/विविध विभागांमधील सहा प्रस्ताव प्रजासत्ताक दिनी पथसंचलनासाठी मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचा प्रस्ताव विलंबाच्या कारणास्तव नामंजूर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर पश्चिम बंगालच्या प्रस्ताव विशेषज्ज्ञ समितीद्वारे दुसऱ्या फेरीतील परीक्षणानंतर फेटाळण्यात आल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचा चित्ररथ होता आघाडीवर
महाराष्ट्राच्या चित्ररथांनी 2015 नंतर दोन वेळा बाजी मारली होती. दोनदा प्रथम क्रमांक पटकावला होता. 2015मध्ये “पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. तर 2018 रोजी “शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. या दोन्ही चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यापूर्वी 1980मध्येही शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. 1983 साली बैलपोळा या विषयावरील चित्ररथ सर्वोत्तम ठरला होता. त्यानंतर 1993 ते 1995 अशी सलग तीन वर्षे अनुक्रमे गणेशोत्सव, शताब्दी, हापूर आंबे आणि बापू स्मृती या चित्ररथांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.