नाराजीमुळे खातेवाटप लटकले
मुंबई : महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र, विस्तार होऊन तीन दिवस झाले तरी खात्यासाठी सुरु असलेली रस्सीखेच व पक्षांतर्गत नाराजीमुळे खातेवाटप लटकले आहे. त्यामुळे नव्याने शपथ घेतलेले 36 मंत्री बिनखात्याचे झाले आहेत.
नाराजी नाट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कसा मार्ग काढणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहा मंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल महिनाभराने 30 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.
26 कॅबिनेट, तर 10 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु तीन दिवस झाले तरी हे 36 जण बिनखात्याचेच मंत्री आहेत. कॉंग्रेसने ग्रामविकास, कृषी किंवा सहकार यापैकी एक खाते मिळावे असा आग्रह धरला असून दिवसभरात तीन बैठका होऊनही यामुळे निर्माण झालेला पेच कायम होता.
महसूल वगळता एकही महत्वाचे व ग्रामीण भागाशी निगडित खाते न मिळाल्याने कॉंग्रेसमध्ये नाराजी आहे.
कृषी, सहकार किंवा ग्रामविकास यापैकी एक खाते मिळावे, अशी कॉंग्रेसची मागणी आहे. यासाठी मंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व प्रमुख नेत्यांच्या बुधवारी तीन बैठका झाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्याकडील एकही खाते सोडायला तयार नाही.
त्यामुळे अजून पेच सुटलेला नव्हता. एकीकडे पक्षात खात्याची रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे पक्षाकडे आलेले चांगले खाते आपल्याला मिळावे यासाठीही रस्सीखेच सुरु आहे. महसूल खात्यासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दावेदार आहेत.
थोरातांकडे महसूल ठेवून अशोक चव्हाणांना सार्वजनिक बांधकाम खातं दिले जाईल, असा अंदाज असला तरी नितिन राऊत व विजय वडेट्टीवार यांनीही सार्वजनिक बांधकाम खात्यावर दावा केला आहे. राष्ट्रवादीत गृह खात्यासाठी अनेक जण दावेदार आहेत. खातेवाटपाला होणारा उशीर यामुळेच असल्याचे सांगितले जात आहे.
नाराजीचा धसका !
मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिन्ही पक्षात नाराजीचे पेव फुटले आहे. मावळत्या सरकारमधील दिवाकर रावते, रामदास कदम व दीपक केसरकर, तानाजी सावंत यांना वगळण्यात आल्याने हे लोक नाराज आहेत. तर नव्याने पक्षात आलेल्या अब्दुल सत्तार, तसेच तीन अपक्षांना पक्षाने मंत्रिपद दिले व निष्ठावंतांना वाटण्याच्या अक्षता लावल्याने शिवसेनेत नाराजी आहे.
आघाडीचे सरकार आणण्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मोठे योगदान आहे. परंतु आपले बंधू सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. तर कदाचित आपली निष्ठा कमी पडली असेल, म्हणून आपला विचार झाला नसावा अशी नाराजी प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.
कॉंगेसच्या संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी तर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने पुण्यातील कॉंग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळुंके यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे खातेवाटपाच्या नाराजीची भर नको म्हणून खातेवाटपाबाबत काळजी घेतली जात असल्याची चर्चा आहे.