जळगाव/ अहमदनगर, – जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. यामुळे नदी- नाल्यांना आलेल्या पुरात सुमार दहा जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत असून त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे.तर तब्बल 800 जनावरे वाहून गेली आहेत. चाळीसगावमधील अनेक गावे, वाड्यावस्त्या पुराच्या पाण्याखाली आहेत. या पुरात चाळीसगावामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
चाळीसगाव तालुक्यातील बाटनादेवी परिसरात मंगळवारी सकाळी 4 ते 7 वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पाऊस सुरु झाला. यामुळे डोंगरी नदीला पुरामुळे जवळपास 15 गावांमध्ये पाणी शिरले. अनेक घरांचे यात मोठे नुकसान झाले, सुमारे 10 नागरिक वाहून गेल्याची भतिी व्यक्त होत असून स्थानिक प्रशासनाच्या हाती वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. अद्याप अनेक गावांतील घरे पाण्याखाली आहेत.
जळगावमध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळल्या. यामुळे महामार्गामवर मोठ्याप्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाढती वाहतूक कोंडी पाहता ही वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलीे. नदीकाठच्या 8 ते 10 खेड्यांमधील साधारणत: 700 ते 800 गुरं वाहून गेलीत तर काही दगावलीत. मात्र अजूनही 8 ते 10 नागरिक या पुराच्या पाण्यात अडकले आहेत. एनडीआरएफची टीम धुळ्याहून जळगावला दाखल झाली असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. डोंगरी आणि इतूर नदीला पूर आल्याने वागळी, चाळीसगाव शहराच्या भागासह 8 ते 10 शहरांना या पुराचा फटका बसला आहे.
कन्नड घाटात दरड कोसळली
राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचे बघायला मिळत आहे. मराठवाडयाला याचा सर्वाधिक फटका बसला होता. गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाने कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. पहाटे दोन वाजल्यापासून औरंगाबाद धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत. कन्नड घाटात चिखलच चिखल झाला आहे. अनेक गाड्या अडकून पडल्या. ढिगाऱ्याखाली वाहने अडकली
दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, दरड कोसळल्यानंतरची दृश्य खूपच भयावह आहेत. ही दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अनेक गाड्या अडकल्याचे दिसत आहे. दरड कोसळली त्या ठिकाणी पोलीस पथक दाखल झाले असून दरड हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. रात्रीपासून या मार्गावर वाहने अडकून पडल्याने नागरीकांना पाणी आणि जेवण मिळणेही मुश्किल झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.