पाटना – मुलांवर आईचं जिवापाड प्रेम असतं हे वेगळ काही सांगण्याची आवश्यकता नाही. मुलाचा जीव वाचविण्यासाठी आई वेळप्रसंगी आपला जीवही धोक्यात घालते. अशा अनेक घटना आहेत. मात्र बिहारमध्ये मुलांच्या मृत्यूचं वृत्त कळताच आईने आपला प्राण सोडल्याचं समोर आले आहे. पोलीस मुलगा मरण पावल्याचे कळताच आईने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या माय-लेकावर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले.
बिहारमध्ये किशनगंज पोलीस ठाण्याचे एसएचओ अश्विनी कुमार यांची पश्चिम बंगालमध्ये कर्तव्य बजावताना जमावाने हत्या केली. १० एप्रिल रोजी पश्चिम बंगालमधील उत्तर दिंजापूरमध्ये ही घटना घडली होती. हे वृत्त अश्विनी कुमार यांच्या आईला कळताच त्यांना धक्का बसला. वयस्कर असलेल्या त्यांच्या आई या धक्क्यातून सावरू शकल्या नाही.
अश्विनी कुमार यांनी दुचाकी चोरीतील आरोपीला पकडण्यासाठी बंगालमधील गावात धाड टाकली असता गावकऱ्यांनी त्यांच्यावर काठ्या आणि दगडांनी हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या अश्विनी कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी बंगाल पोलिसांकडून आवश्यक ती मदत मिळाली नसल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला आहे.