मुंबई – पंढरपूर पोट निवडणूकीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरात सभा घेतली. त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन सरकारवर टीका केली.
‘सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा, ते आपण बदलू. पण या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढ्याच्या मतदारांना मिळाली आहे,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.
राऊत म्हणाले, सरकार पडणार, पाडणार, पाडू हे ठीक आहे. पण जेव्हा ते सरकार पाडतील तेंव्हा आम्ही त्यांचे अभिनंदन करू. तसेच विठूराया आमच्या सरकारच्या पाठीशी आहे. देवेंद्र फडणवीस जे बोलले ते सर्वचजण बोलतात. त्या बोलण्याकडे तेवढ्यापूरतेच लक्ष द्यायचे असते, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी चंग बाधला असून निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. या पोट निवडणूकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे व राष्ट्रावादी पक्षाचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या निवडणूकासाठी 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.