जुन्नर-आंबेगाव परिसरात रोहित्र जळण्याचे, नादुरुस्तीचे प्रमाण वाढले
बेल्हे – जुन्नर-आंबेगाव तालुक्यात रोहीत्र जळण्याचे, तसेच नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून या दोन्ही तालुक्यांत तीनशेहून अधिक रोहित्र नादुरुस्त झाली आहेत. काही गावांमध्ये एक महिन्यापासून ते चार महिने झाले तरी रोहित्र बसवलेले नाहीत. महावितरण कंपनीच्या या कामकाजामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, राज्य शासनाने यावर त्वरित दखल घ्यावी अन्यथा आगामी वर्षात ग्राहक पंचायतीच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्राहक पंचायतीचे ग्राहक संघटन मंत्री बाळासाहेब औटी यांनी बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे दिला.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर व कृषी विभाग, तसेच महावितरण कंपनीच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर आणि तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ उपस्थित होते.
यावेळी बोरी बुद्रुक गावच्या सरपंच पुष्पा कोरडे, ग्राहक पंचायतीच्या तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, शैलेश कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक भोर यांनी केले तर आभार गावच्या सरपंच पुष्पा कोरडे यांनी मानले.
आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, शेतकऱ्यांना शेतात रात्रींचे पाणी देणे जोखमीचे झाले आहे. महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे वीज बिल थकवल्याने नव्या पथदिव्यांची कामे होत नसल्याने यावर वितरण कंपनीने तोडगा काढणे गरजेचे आहे. या कामांना त्वरीत परवानगी देण्यात यावी.
– बाळासाहेब औटी ग्राहक पंचायतीचे ग्राहक संघटन मंत्री
वीज ग्राहकांच्या तक्रार नोंदवण्यासाठी महावितरण कंपनीने कॉलसेंटरची सुविधा चालू केली असून, त्याचा टोल फ्री क्रमांक वीज बिलावर नमुद केलेला आहे. त्याचा उपयोग वीज ग्राहकांनी करावा, तसेच वीज ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण योग्य पध्दतीने आणि ठराविक मुदतीत घेण्यासाठी वीज नियामक आयोगाच्या ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच आणि अंतरंग तक्रार निवारण मंच, विद्युत लोकपाल अशा त्रिस्तरीय यंत्रणा निर्माण केल्या आहेत. या यंत्रणांचाही उपयोग ग्राहकांना करता येईल.
– प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी