नवी दिल्ली – उद्या म्हणजे शनिवारी निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. लोकसभेसोबतच ओडिशा, सिक्किम, अरूणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांत विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर लगेचच देशभरात आचारसंहिता ( code of conduct) लागू होणार आहे. आचारसंहिता काय असते, ती कोण लागू करतो आणि आचारसंहिता सुरू असल्याच्या काळात कोणती कामे होतात आणि कोणती करता येत नाहीत याची बऱ्याच जणांना माहिती नसते.
आचार संहिता
देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका संपन्न व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम केले आहेत. त्या नियमावलीलाच आचारसंहिता म्हटले जाते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी या नियमांचे पालन करणे सरकार, राजकीय पक्ष आणि या पक्षांचे नेते यांच्यासाठी बंधनकारक असते.
केंद्र आणि राज्यातील सत्तारूढ पक्ष आणि प्रत्येक उमेदवाराने या आचारसंहितेचे पालन करावे याची निवडणूक आयोग घटनेच्या कलम ३२४ अन्वये खबरदारी घेते. त्याचबरोबर याचीही खबरदारी घेतली जाते निवडणुकीच्या हेतूने अधिकारी प्रणालीचा दुरूपयोग होऊ नये. निवडणुका जाहीर झाल्या की त्या क्षणापासून सरकारी कर्मचारी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी होतात. आचारसंहिता ही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने लागू करण्यात आलेली व्यवस्था आहे.
कधीपर्यंत असते मुदत?
उद्या निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळेच उद्याच आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर ती निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कायम राहील म्हणजे निवडणुकांचा निकाल हाती येईपर्यंत ती लागू राहील. प्रक्रिया समाप्त झाली की आचारसंहिताही समाप्त होते.
कोणावर कारवाई?
कोणी सामान्य माणसाने आचारसंहितेचे उल्लंघन केले तर त्याच्यावरही कारवाई करण्याची तरतूद आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास जर तुम्ही तुमच्या नेत्याच्या प्रचारात सहभागी असाल तर तुम्हाला नियमांचे पालन करावे लागेल. एखाद्या नेत्याने तुम्हाला नियम वगळून कोणते काम सांगितले तर तुम्ही त्याला आचारसंहितेकडे लक्ष वेधत ते कार्य करण्यास नकार देऊ शकतात. आचारसंहितेचे उल्लंघन करताना तुम्ही आढळलात तर अटकेची कारवाई होऊ शकते.
बदल्या- नियुक्ती नाही –
आचारसंहिता लागू झाल्यावर सरकार कोणत्याही बदल्या अथवा नियुक्त्या करू शकत नाही. एखाद्या कर्मचाऱ्याची अथवा अधिकाऱ्याची बदली करणे अत्यंत आवश्यक झाले असेल तर त्यासाठीही सरकारला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. आचारसंहितेच्या काळात राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त गरजेनुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
कोणालाच मुभा नाही –
राजकीय पक्षांना मिरवणूक काढायची असेल तर त्याची अगोदर परवानगी घ्यावी लागते. संबंधित उमेदवाराला जवळच्या पोलीस ठाण्याला त्याची माहिती द्यावी लागते. पक्षाची अथवा उमेदवाराची जाहीर सभा होणार असेल तर त्याबाबतही कळवावे लागते. राजकीय पक्ष कोणताही असो वा नेता कोणीही असो ते आचारसंहितेचे उल्लंघन करू शकत नाहीत.
निवडणुकीच्या काळात गुन्हे, दुराचार, भ्रष्ट व्यवहार, लाचखोरी, मतदारांना आमिष दाखवणे, मतदारांना धमकावणे अथवा भयभीत करणाचे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाते. आयोग एखाद्या उमेदवाराला निवडणूक लढण्यापासून रोखण्याची कार्यवाहीही करू शकतो. संबंधित व्यक्तीच्या विरोधात एफआयआर दाखल केली जाते आणि दोष सिध्द झाला तर त्याला तुरूंगातही जावे लागू शकते.
या गोष्टी करता येत नाही –
१. आचारसंहिता लागू झाल्यावर सरकार नव्या योजनेची घोषणा, भूमिपूजन अथवा लोकार्पण करू शकत नाही.
२. प्रचारासाठी सरकारी साम्रगीचा वापर करता येत नाही. सरकारी गाडी, बंगला, विमानाच्या वापरास मनाई,
३. धार्मिक स्थळे अथवा प्रतिकांचा वापर करण्यास मनाई.
४. भींतींवर लिहिलेल्या घोषणा, पोस्टर्स हटवली जातात.
५. मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी वाहनांचा वापर करता येत नाही.
६. मतदानाच्या दिवशी आणि २४ तास अगोदर मद्य वितरणास मनाई.
७. निवडणुकीशी संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्या मंत्र्याची अथवा नेत्याची त्याच्या घरी अथवा प्रवासात भेट घेण्यास मनाई.
८. पक्ष आणि उमेदवारावर व्यक्तीगत पातळीवरची टीका करता येणार नाही.
९. धर्म आणि जातीच्या आधारावर मते मागता येणार नाहीत.