नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांना अद्याप बराच अवकाश आहे. मात्र, कॉंग्रेस पक्षाने आतापासूनच या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि या पक्षाचे बडे नेते राहुल गांधी यांनी गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या अमेठी मतदारसंघातून अगोदरच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर राहुल पुन्हा एकदा अमेठीतून आपले नशीब आजमावणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून राहुल यांचा पराभव झाला होता. त्यांनी नंतर केरळच्या वायनाड येथून लोकसभेत प्रवेश मिळवला. राहुल यांचे पिता राजीव गांधी, काका संजय गांधी यांनी आणि नंतर स्वत: राहुल यांनी अमेठीचे प्रतिनिधित्व केले आहे. असे असूनही भारतीय जनता पार्टीच्या स्मृती इराणी यांनी त्यांना मात दिल्यामुळे याची बोच कॉंग्रेस पक्षाला होती. ती आता दूर करत पुन्हा अमेठीत मिळवण्याच्या इराद्याने कॉंग्रेसने तयारी सुरू केली आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार कॉंग्रेसने दिवाळी सणाचा मुहूर्त साधत अमेठीतील प्रत्येक दार ठोठावले आहे. कार्यकर्त्यांची पुन्हा जमवाजमव सुरू केली आहे. अमेठी मतदारसंघातील तब्बल पाच हजार कार्यकर्त्यांना मिठाई घरपोच पाठवण्यात आली आहे. यासोबतच काही भेटवस्तूही त्यांना देण्यात आल्या आहेत. जे कीट पक्षाकडून देण्यात आले आहे त्यावर राहुल आणि त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांची छायाचित्रे आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या या पॅकेटस्वर कॉंग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्हही लावण्यात आले आहे.
दिवाळीत अशा आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटवस्तू देणे ही सामान्य बाब मानली जाते. मात्र, कॉंग्रेसने ज्या प्रकारे अमेठीत वाटप केले आहे त्याचा संबंध निवडणुकीशी जोडला जातो आहे. उत्तर प्रदेशचे नवे कॉंग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी अगोदरच राहुल गांधी अमेठीतून लढतील असे जाहीर केले आहे. स्वत: राहुल यांनी काही खुलासा केला नसला तरी राय यांच्या म्हणण्यानुसार राहुल यांनी उत्तर प्रदेशातूनच लोकसभेवर जावे, असा कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
काय भेटवस्तू दिल्या?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेस पक्षाकडून ज्या भेटवस्तू पाठवण्यात आल्या आहेत त्या पॅंट- शर्टचे कापड, काही मिठाई आणि दिवे यांचा समावेश आहे. अर्थात केवळ कॉंग्रेसनेच असे केले आहे अशातला भाग नाही. अमेठीच्या विद्यमान खासदार स्मृती इराणी यांनीही दिवाळीच्या मुहूर्तावर भेटवस्तूंचे वाटप केले आहे. त्यात मोबाइल फोन, भिंतीवरचे घड्याळ आणि पणत्या आदींचा समावेश आहे.