त्रिचनपल्ली – लोकसभा निवडणुकीची सध्या देशभर रणधुमाळी सुरु आहे. अशा परिस्थितीत विविध पक्षाचे नेते, उमेदवारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण आपापल्या निवडणूक प्रचारात आपली ताकद पणाला लावत आहेत. राजकीय पक्ष त्यांच्या प्रचारामुळे चर्चेत आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले एस दामोदरनही चर्चेत आहेत. ते चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांची प्रचाराची पद्धत. (lok sabha elections 2024 s damodaran campaigns in unique way for tiruchirappalli seat)
त्रिचनपल्ली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले दामोदरन भाजी विक्रेत्यांशी संवाद साधून, फुलांचे हार बनवून आणि भाजीपाला विकून प्रचार करत आहेत. या ६२ वर्षीय नेत्याचे निवडणूक चिन्ह गॅस स्टोव्ह आहे. गांधी मार्केटमध्ये आलेल्या लोकांशी आणि भाजी विक्रेत्यांशी गप्पा मारत ते मते मागत आहेत.
#WATCH | Tiruchirappalli, Tamil Nadu: Independent candidate from Trichy Lok Sabha seat Padma Shri S Damodaran indulges in making flower garland and sells vegetables as the part of Election Campaign pic.twitter.com/9iARbrat1O
— ANI (@ANI) April 11, 2024
दामोदरन म्हणाले, ‘मी त्रिचनपल्ली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलो आहे. मी पृथ्वीचा पुत्र आहे. मी त्रिची शहराशी संबंधित आहे. मी ४० वर्षांहून अधिक काळ स्वच्छता केंद्रात सहयोगी सेवा स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. मी वयाच्या २१व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. आता मी ६२ वर्षांचा आहे. स्वच्छता केंद्रात काम केल्याबद्दल मला तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
दामोदरन म्हणाले, ‘मी वयाच्या २१ व्या वर्षी सामजिक कार्य करण्यास सुरुवात केली. तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते. मी नऊ पंतप्रधानांच्या कार्यकाळात काम केले. या काळात मी शहर आणि ग्रामीण भागात स्वच्छतेची अनेक कामे केली. मी सर्व केंद्र पुरस्कृत ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमांतर्गत काम केले आणि प्रत्येक गावाला आदर्श गाव बनवले. आता मी आजपासून माझ्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यासाठी मी गांधी मार्केटला गेलो. मी जिथे जातो तिथे माझे अप्रतिम स्वागत होत आहे.
त्रिचीच्या जनतेची ही मागणी
त्रिचनपल्लीमधील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्याबाबत विचारले असता दामोदरन म्हणाले, ‘त्रिचीला स्वच्छ आणि हरित शहर बनवण्यासाठी आपल्याला काम करण्याची गरज आहे. अनेक बस आणि वाहतूक वाहने त्रिचीमधून जात असल्याने लोक रिंग रोडची मागणी करत आहेत. आम्ही त्रिची शहरातील महत्त्वाच्या भागात उड्डाणपुलांची मागणी करत आहोत.