नवी दिल्ली :- बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या विरोधक ऐक्याला प्रत्यक्ष आकार देण्याचा क्षण दृष्टीपथात आला आहे. बिहारची राजधानी पाटण्यात उद्या (शुक्रवार) विरोधी पक्षांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्या माध्यमातून विरोधी पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी म्हणजेच मिशन 2024 साठी भाजप विरोधात रणशिंग फुंकतील.
बैठकीतून राष्ट्रीय स्तरावर व्यापक आघाडी उभी राहण्याचे सूतोवाच होणार की वेगळीच रणनीती समोर येणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
पुढील लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधीही उरलेला नाही. त्या निवडणुकीत भाजपला तगडी फाईट देण्यासाठी एकत्र येण्याचा सूर विरोधकांकडून सातत्याने आळवला जात होता. प्रत्यक्षात त्या दिशेने ठोस प्रयत्न होत नव्हते. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांना एकत्र आणण्याचा संकल्प केला आणि तसे प्रयत्नही सुरू केले.
आता त्यांच्याच पुढाकारातून पाटण्यात बैठक होत आहे. नितीश यांच्या खांद्याला खांदा लावून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव बैठकीचे यजमानपद भुषवत आहेत.
संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या बैठकीला कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, त्या पक्षाचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन अशी विरोधी गोटातील वजनदार नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे.
सपचे अध्यक्ष अखिलेश यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, डाव्या पक्षांचे नेतेही बैठकीत सहभागी होतील. सुमारे 20 विरोधी पक्षांचे नेते एकत्र येण्याची शक्यता असल्याने बैठकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे.
एकत्र आल्यास भाजपच्या राजकीय घोडदौडीला लगाम घालणे शक्य होईल, अशी भूमिका घेत विरोधकांनी हातमिळवणीला हिरवा कंदील दाखवला आहे. भाजपला रोखणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे विरोधक सातत्याने सूचित करत आहेत.
त्यामुळे उद्याच्या बैठकीत आगामी निवडणुकीसाठीची रणनीती, पंतप्रधानपदाचा उमेदवार, जागावाटप अशा अडचणीच्या ठरणाऱ्या मुद्द्यांना बगल दिली जाईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे बैठकीला विरोधकांची मनं जुळवणाऱ्या स्नेहमेळाव्याचे स्वरूप मिळण्याचीच अधिक शक्यता आहे.
ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसने आगामी निवडणुकीचा विचार करता गुड बिगिनिंग अशा शब्दांत बैठकीचा उल्लेख केला आहे. तर, योग्य दिशेने पडलेले पाऊल अशा शब्दांत डाव्या पक्षांनी बैठकीचे स्वागत केले आहे.