पवनानगर, दि. 14 (वार्ताहर) – केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर राज्यातील शेती विषयक समस्या जाणून घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत, विविध मागाण्यांचे निवेदन सादर केले. कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात यावी . तसेच पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा किमान पाच एकरपर्यंत करण्यात यावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
या शिष्टमंडळात मावळातील शेतकरी मुकुंद ठाकर, ज्ञानेश्वर आडकर दिलीप काळे तानाजी शेंडगे चंद्रकांत कालेकर, हेमंत कापसे, जयसिंग हुलावळे ज्ञानेश्वर ठाकर, रामदास पवार यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाशी तोमर यांनी चर्चा केली.
मावळ तालुक्यात गुलाब फुलांसाठी पोषक वातावरण असल्याने या फुलांच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच कृषी आयुक्त धीरज कुमार यांना शेतकऱ्यांच्या समस्या थेट बांधावर जाऊन समजून घ्या व कृषी मंत्रालयात समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सुचना दिल्या. या वेळी कृषी संचालक डॉ. कैलास मोते, दिलीप झेंडे,विकास पाटील, दशरथ तांभाळे, अतिरिक्त प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, कृषी उपसंचालक विजय कानडे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ हे उपस्थित होते.
या आहेत मागण्या
कृत्रिम फुलांवर बंदी घालावी.
पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा किमान पाच एकरपर्यंत करावी.
पॉलिहाऊस उभारणीचा खर्च चालू बाजारभावा प्रमाणे धरावा.
पॉलिहाऊस उभारणीचे स्टीलवरील जीएसटी 18 वरून पाच टक्के करावा.
पॉली हाऊसचे अनुदान मिळण्याची प्रक्रिया सुलभ करावी.
मावळ तालुक्यामध्ये ऑक्शन सेंटर उभारावे.
विमा पॉलिसी धोरणामध्ये बदल करावा.
माल निर्यात करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात.