नवी दिल्ली – आशा गमावू नका, 100 दिवस झाले आहेत. 100 आठवडे किंवा 100 महिने जरी लागले तरी जोपर्यंत सरकार हे काळे कायदे परत घेत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा तुमच्या साथीने सुरूच ठेवणार आहोत,असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी आज दिले आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास आता 100 दिवस उलटल्यानंतरही अद्याप हे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून, केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे त्यांना मान्य नसून, ते रद्द करण्याची त्यांची मागणी कायम आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रिये मुळे आंदोलक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे मानण्यात येत आहे.
शेतकरी 100 दिवसांपासून संघर्ष करत आहेत. 300 पेक्षा अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. शेतकऱ्यांकडे जाऊन चर्चा करणे हे सरकारचे कर्तव्य होते. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या बलिदानाची थट्टा केली, शेतकऱ्यांचा अपमान केला. मी वचन देते की 100 दिवसंच काय 100 महिने जरी लागले तरी देखी मी शेतकऱ्यांसोबत उभी राहील. असे त्या म्हणाल्या.
प्रियंका यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि त्यांच्या व्यथांची या सरकारला पर्वा नाही. हे सरकार आत्मप्रौढीने भरलेल्या नेत्यांचे आहे. त्यांना त्यांच्या खोट्या प्रतिमेपुढे शेतकऱ्यांचे मरण दिसेनासे झाले आहे. सरकारने पुढाकार घेऊन हे आंदोलन संपवण्याचा सुज्ञपणा दाखवायला हवा होता, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.