जेजुरी (वार्ताहर) – आळंदी-पंढरपूर पालखी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 हा विकसित होत आहे. जेजुरी शहरातून हा महामार्ग जात असून या रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूच्या रहिवाशांना विश्वासात न घेता, तसेच त्यांचा जागा देण्यासाठी विरोध असतानाही जागा भूसंपदित करण्यासाठी सतत दबाव आणला जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस समसमान जागा संपादित करा, अथवा जेजुरी शहरा बाहेरून बाह्यवळण करा किंवा आधी आमचे पुनर्वसन करा, अशी भूमिका अन्यायग्रस्त नागरिकांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 हा विकसित होत आहे. पुरंदर तालक्यातून हा महामार्ग जात असताना सासवड व नीरा शहरा बाहेरून बाह्यवळण काढण्यात आले आहे. मात्र जेजुरी हे तीर्थक्षेत्र व सतत गर्दीचे ठिकाणी असूनही जाणूनबुजून जेजुरी शहरा बाहेरून बाह्यवळण रस्ता न करता शहरातून रस्ता होणार आहे.
येथील नागरिकांचा या महामार्गाला विरोध नसून सध्या अस्तित्वात असणार्या रस्त्याचा मध्य घेवून या रस्त्याच्या दक्षिण व उत्तर बाजूस 26 मीटरचा समसमान रस्ता करावा अथवा बाह्यवळण करावे ही गेली दोन वर्षांपासून मागणी आहे; मात्र केवळ या रस्त्याच्या उत्तरेकडील बाजू भूसंपादीत करण्याचा घाट घातला आहे.
रस्ता रुंदीकरणासाठी 2015मध्येही उत्तरेकडील जागा भूसंपादित करण्यात आली. या रस्त्याचा अद्याप मोबदला अन्यायग्रस्त नागरिकांना दिला गेला नाही. उदरनिर्वाह करण्याचे साधन व घरे गेल्याने येथील कुटुंबे वैफल्यग्रस्त झाली आहेत. राष्ट्रीय महामार्ग विकसित होत असताना जेजुरी शहरातील अनेक दुकाने घरे उद्ध्वस्त होणार असून उदर निर्वाहाचे साधन जाणार असल्याने अनेक कुटुंबे बेघर होणार आहेत.
ही कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. या रस्त्याला येथील नागरिकांचा विरोध असून या कुटुंबांनी राष्ट्रपती यांच्याकडे इच्छा मरणास अर्ज केला आहे. तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभागाकडे अर्ज करूनही दखल घेतली गेली नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
नागरिकांवर दबाव
या रस्त्याच्या कामासाठी जेजुरी शहरातील केवळ उत्तरेकडील बाजूस असणार्या जागा भूसंपादित करण्यासाठी सतत शासकीय पातळीवरून नागरिकांवर दबाव आणला जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.