मुंबई : सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहे. पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यंदाची ही निवडणूक चुरशीची होणार असे दिसते आहे. अशातच सदाभाऊ खोत हे अपक्ष म्हणून कसे निवडून येणार ? या प्रश्नाचे उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. सदाभाऊ खोतांना भाजपचा पाठिंबा असेल तर ते जरूर निवडून येतील असे त्यांनी म्हंटले आहे.
सदाभाऊंना भाजपचा पाठिंबा
याबाबत पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, सदाभाऊ खोतांना भाजपचा पाठिंबा असेल तर ते जरुर निवडून येतील. ते पुढे म्हणाले ते शेतकऱ्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न ते हिरीरीने मांडतात. त्यांचा विधिमंडळातील सहभाग हा प्रत्येक शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व असेल. त्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठीही आझाद मैदानावर आंदोलन केले . त्यामुळे त्यांच्यासारख्या रणझुंजार नेत्याचं विधीमंडळात असणं राज्याच्या हिताचं आहे, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. भाजपच्या पाच अधिकृत उमेदवारांसह सदाभाऊंना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
सदाभाऊंनी भरला भाजप समर्थित अपक्ष उमेदवारी अर्ज
विधानपरिषदेसाठी भाजपकडून अधिकृत रित्या जाहीर केलेल्या यादीमधून सदाभाऊ खोत यांच्या नावाची वर्णी लागली नाही. त्यामुळे राजकीय वातावरणात याची मोठी चर्चा झाली. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सदाभाऊ खोत यांनी भाजप समर्थित अपक्ष म्हणून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे . विधानपरिषदेसाठी आता १० जागा आणि १२ उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे चुरसही वाढली आहे.